Maharashtra Girls Missing Mystery :
Maharashtra Girls Missing Mystery :  Sarkarnama
पुणे

Pune Girls Missing Mystery: अडीच वर्षांत १ हजार २१३ अल्पवयीन मुली बेपत्ता; पळून जाण्यामागची पोलिसांनीच सांगितली कारणे

अनिल सावळे

Minor Girls Missing Analysis: धायरी परिसर... मुलीचे वय वर्षे १४. मैत्रिणीकडे जाऊन येते, असे सांगून ती २४ मे रोजी घराबाहेर पडली; परंतु ती अद्याप घरी परतलीच नाही. आईने काळजीपोटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली... शहरात ( Pune) मागील अडीच वर्षांत १ हजार २१३ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी ६६३ मुली घरी परतल्या असून, अद्याप ५५० मुली बेपत्ताच असल्याचे समोर आले आहे. यात १४ ते १७ वर्षे वयोगटांतील मुलींचे प्रमाण अधिक आहे. मात्र यात मानवी तस्करी तसेच धार्मिक किंवा जातीयता असा काही प्रकार आढळून आला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

वडगाव बुद्रुक भागातील १५ वर्षांची मुलगी खेळायला जाते म्हणून घराबाहेर गेली. आमिष दाखवून मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या आईने सिंहगड पोलिस ठाण्यात दिली आहे. कोथरूड परिसरातून दुपारी एका १३ वर्षांच्या मुलीला पळवून नेल्याची घटना घडली. वारज्यात १७ वर्षांची मुलगी बाहेर जाऊन येते म्हणून सांगून गेली, तीही अद्याप घरी परतलेली नाही. (Pune Police)

येवलेवाडी परिसरातून १२ वर्षांच्या मुलाला पळवून नेल्याची तक्रार कोंढवा पोलिसांनी दाखल केली आहे. बुधवारी (ता. २४) एकाच दिवशी या वेगवेगळ्या घटनांमध्ये चार मुली, एक मुलगा असे पाच जण घरातून निघून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या पाच जणांसह मागील आठवड्यात वेगवेगळ्या कारणांमुळे दहा अल्पवयीन मुलींसह तीन मुले बेपत्ता झाल्याची पोलिसात नोंद आहे. ( Maharashtra Politics)

मागील आठवड्यातील घटना (२० मे ते २५ मे २०२३) :

स्थळ-मुलीचे वय-गुन्हा दाखल-पोलिस ठाणे

- मंगळवार पेठ-१४ वर्षे-फरासखाना

- कदमवाक वस्ती-१७ वर्षे-लोणी काळभोर

- डोंगरगाव (ता. हवेली)-१६ वर्षे-लोणीकंद

- वारजे (दोन मुले)-१७ वर्षे-वारजे

- कात्रज-१८ वर्षे-भारती विद्यापीठ

- कोथरूड-१४ वर्षे-कोथरूड

- गणेश पेठ-१७ वर्षे-फरासखाना

काही घटनांमधून समोर आलेली निरीक्षणे...

- प्रेमप्रकरण : प्रेमसंबंध असणे किंवा आई-वडिलासोबत क्षुल्लक वादातून घरातून निघून जाणे.

-हट्टी स्वभाव : काही लहान मुले-मुली हट्टी स्वभावाची असतात. त्यातून बऱ्याचदा ती घरी न सांगता बाहेर मित्रमैत्रीण किंवा नातेवाइकांकडे जातात. त्यापैकी काही मुले-मुली दोन-तीन दिवसांत घरी परत येतात.

- सोशल मीडियातून आकर्षण : मोबाईलवर सोशल मीडियाचा मुक्त वापर होतो. या वयात मुले-मुली तारुण्यात येत असतात. प्रेमाच्या आकर्षणातून आमिषाला बळी पडून लहान मुली गैरमार्गावर जाण्याची शक्यता असते.

- पालकांचे दुर्लक्ष : आई-वडील कामानिमित्त दिवसभर घराबाहेर असल्याने मुला-मुलींकडे दुर्लक्ष होते.

- इतर कारणे : घरातील वातावरण, आर्थिक परिस्थिती, व्यसनापोटी घरात सतत भांडण, शिक्षणाचा अभाव, संगत

समुपदेशकांचा पालकांना सल्ला...

पालकांनी मुलांसोबत सुसंवाद साधावा

मुलांसोबत मैत्रीचे नाते जपण्यासोबत आदरयुक्त धाकही आवश्यक

मुलांचे मित्र-मैत्रीण कोण आहेत, हेही पाहणे महत्त्वाचे

पालकांनी मुलांवर योग्य संस्कार होतील, असे स्वत:चे वर्तन ठेवावे

कुटुंबातील व्यक्तींनी मुलांसमोर वाद टाळावेत

गरज भासल्यास योग्य समुपदेशकाकडून सल्ला घेणे गरजेचे

मुलांना मारहाण न करता समजावून सांगावे

याबाबत कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशक डॉ. स्मिता प्रकाश जोशी सांगतात की, 'पालकांनी मुलांसमोर वाद टाळावेत. वाद असले तरी मुलांना आई-वडिलांचे प्रेम मिळाले पाहिजे. मुलांना सोशल मीडियापासून लांब ठेवणे शक्य नसले तरी ते काय पाहतात, यावर लक्ष ठेवणे ही पालकांची जबाबदारी आहे. पालकांनी मुलांना पुरेसा वेळ द्यावा. कुटुंबासमवेत एकत्र जेवण, सुटीत मुलांसोबत एकत्रित बाहेर जावे. जेणेकरून मुले-मुली इतर प्रलोभनापासून दूर राहतील.'

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT