Laxman Jagtap-Shrirang Barne
Laxman Jagtap-Shrirang Barne Sarkarnama
पुणे

Jagtap-Barne News : लक्ष्मण जगतापांसोबतची १० वर्षांची राजकीय दुश्मनी अशी संपवली : खासदार बारणेंनी सांगितली आठवण

उत्तम कुटे

पिंपरी : चिंचवडचे (Chinchwad) आमदार लक्ष्मण जगताप (Mla Laxman Jagtap) यांचे ता. ३ जानेवारी रोजी कर्करोगाने निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी (ता. १४ जानेवारी) सर्वक्षीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात लक्ष्मण जगताप यांच्याबरोबरचे दहा वर्षांचे कट्टर राजकीय वैर कसे संपवले, याला मावळचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी उजाळा दिला. (10-year political feud with Laxman Jagtap ended like this : MP Barne)

लक्ष्मणभाऊंच्या स्मृती जागवताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा, तर कंठच यावेळी दाटून आला होता. त्यांच्यासह इतर मंत्री, माजी मंत्री, खासदार,आमदारांनी लक्ष्मण जगतापांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांचे दहा वर्ष कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी राहिलेले खासदार बारणे हेही भाऊंविषयी बोलताना भावूक झाले. अप्पा व भाऊंमधील वैर २००९ पासून सुरु झाले. त्यावर्षी भाऊंनी विधानसभेला अप्पांचा चिंचवड मतदारसंघात पराभव केला. त्याची परतफेड अप्पांनी २०१४ ला भाऊंचा लोकसभेला मावळ मतदारसंघात पराभव करून केली, त्यामुळे हे वैमनस्य आणखी वाढले. ते २०१९ च्या लोकसभेपर्यंत कायम होते.

लक्ष्मणभाऊ हे श्रीरंगअप्पांच्या प्रचारात सामील झाले नव्हते, त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनाच त्यासाठी पुढाकार घ्यावा लागला. त्यानंतर अप्पा हे ७ एप्रिल २०१९ च्या रात्री भाऊंच्या घरी गेले. आता संघर्ष होणार नाही, असा शब्द दिला. लगेच दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपल्यातील दुरावा दूर झाल्याचे जाहीर केले. आमच्यात राजकीय मतभेद होते. मनभेद नव्हते, असे अप्पा त्यावेळी म्हणाले होते. पक्ष महत्वाचा असल्याने मोदींना पंतप्रधान करण्यासाठी स्वार्थ बाजूला ठेवल्याची प्रतिक्रिया भाऊंनी दिली होती.

भाऊ व आपल्यातील राजकीय संघर्ष मिटण्यास कारणीभूत ठरलेले फडणवीस, भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष व सध्याचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन हे या वेळी उपस्थित आहेत, याचा खासदार बारणेंनी खास उल्लेख केला. भाऊंचे कार्य कोणी नाकारू शकणार नाही, असे ते म्हणाले. चांगले काम करणारा नेता या शहराने गमावला, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. एक राजकीय कार्यकर्ता कसा असावा, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. कोणाला विकासासाठी काम करताना बरोबर घेतले पाहिजे, एखादे कार्य कशा पद्धतीने तडीला न्यावे, याची क्षमता त्यांच्यात होती, असे ते म्हणाले. दरम्यान,२०१९ मध्ये अप्पा आणि भाऊंमध्ये झालेली ही दिलजमाई गेली तीन वर्षे आतापर्यंत टिकून होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT