Palkhi Marg news:
Palkhi Marg news:  Sarkarnama
पुणे

Palkhi Marg news: गडकरींकडून वारकऱ्यांना नव्या वर्षात मोठी भेट: पालखी मार्गाचे होणार उद्‌घाटन

अनुराधा धावडे

Palkhi Marg news: संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालखी मार्गांचे ८५ टक्के काम पूर्ण झालंय. डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण झालं की नवीन वर्षात पालखी मार्गाचे उद्घाटन होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. महाराष्ट्रातील आळंदी व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची आज खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर व अधिकारी यांच्यासह पाहणी केली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज ही दोन्ही महाराष्ट्राची दैवतं आहेत. त्याला जोडून पंढरपूर हा देखील तेवढाच जिव्हाळ्याचा विषय आहे. तर देहूपासून पंढरपूर या पालखीमार्गावर मोठ्या प्रमाणात लाखो वारकरी अनवाणी वारी करत असतात. माझं भाग्य आहे की मला या मार्गाचे काम करण्याची संधी मिळाली. आज रणजितसिंह निंबाळकर यांच्या मदतीने रस्त्याची पाहणी केली. सोबतच जेजुरीच्या मंदिरही पाहून झालं.

खऱ्या अर्थाने पालखी मार्ग व्हावा

संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे आळंदी ते पंढरपूर आणि संत तुकाराम महाराज म्हणजे देहू ते पंढरपूर, यातील तीन महत्त्वाची जी धार्मिक स्थळे आहेत. देहू, आळंदी आणि पंढरपूर या तीन पालखी मार्गाच्या रस्त्याचे भूमिपूजन ८ नोव्हेंबर २०२१ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या मार्गावर चालताना आपण फक्त रस्त्यावर चाललोय असं न वाटता हा मार्ग खऱ्या अर्थाने भक्ती मार्ग व्हावा, या यामागचा उद्देश आहे.

८ हजार कोटींच पॅकेज

आळंदी ते पंढरपूर यात हडपसर ते मोहोळ या २३५ किलोमीटरच्या मार्गात एकूण सहा पॅकेजेस आहेत. याची किंमत आठ हजार कोटी इतकी आहेत. या सहा पॅकेजेसमधील पाच पॅकेजेस आज मी पाहिले. पाच पॅकेजेसची कामे प्रगतीपथावर आहेत. सहाव्या पॅकेजची निविदा प्रक्रिया आता सुरु झाली आहे. त्याचं भूसंपादन अंतिम टप्प्यात आहे. यात दोन पदरी रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आलं असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं

पालखीसाठी वेगळी व्यवस्था

पालखीसाठी वेगळी व्यवस्था केली आहे. पायांना चटके बसू नयेत म्हणून मी शेगावला टाईल्स लावल्या होत्या, त्यात गवत लावलं होतं. पण इथे बिटुमेन केलं आहे. पण बिटुमेन देखील गरम होतं, त्याबाबत काय करता येईल यासंदर्भात मी आज अधिकाऱ्यांशी बोलणार आहे.

स्थानिकांना रोजगार

बायपासचाही पर्याय आम्ही उपलब्ध करुन दिला आहे. या मार्गात एकूण १२ पालखी स्थळे आहेत. या मार्गावर वारकऱ्यांना राहण्याची सोयी उपलब्ध करुन देता यावी मोठा हॉल बांधावा, इतर वेळी तो हॉल लग्न कार्यासाठी उपलब्ध करून दिल्यास हॉलचा मेंटेनन्स मार्गी लागेल, असे त्यांनी सांगितले. यासोबतच तेथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी भाजीपाल्याची दुकाने, हॉटेल्स, उसाचं गुऱ्हाळ, छोटीमोठी दुकाने उभारण्यात येतील, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

पालखी मार्गावर वृक्षलागवड

याशिवाय या मार्गावर वृक्षलागवड करण्यात येणार आहे. कडुलिंबाचे ६३०२, वड २८८५, पिंपळ ३५४९, जांभुळ २६३५, चिंच १८४३, उंबर ३८०, अर्जुन मोहंगी, करज, तमन, बॉटल ब्रश मिळून १२४५ अशी जवळपास १८८३८ वृक्ष या मार्गावर लावले जाणार आहे, यातील बरीच झाडे आम्ही खरेदीही केली आहेत. असंही नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT