Narendra Modi
Narendra Modi Sarkarnama
पुणे

लसीकरणाचा शंभर कोटींचा टप्पा गाठणाऱ्या नव्या भारताची नवी प्रतिमा जगासमोर

मंगेश वैशंपायन - सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाचा शंभर कोटींचा टप्पाा गाठणाऱ्या नव्या भारताची नवी प्रतिमा जगासमोर आली आहे. जे लोक महामारी काळात अनेक प्रश्न विचारत होते त्यांना १३० कोटी देशवासीयांनी, या लसीकरणातूनच उत्तर दिले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले.

देशाला उद्देशून केलेल्या भाषणात मोदींनी देशाची अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत असल्याचा दावा केला. त्याचबरोबर सणांच्या काळात मास्क वापरण्यापासून आरोग्य नियमांचे पालन करणे देशवासीयांनी सोडू नये, असा सावधानतेचा इशाराही दिला. आपल्या सरकारने लसीकरणाच्या मोहिमेवर ‘व्हीआयपी’ संस्कृतीचे आक्रमण होऊ दिले नाही. उच्चपदस्थ, श्रीमंत यांच्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही लस मोफत मिळत आहे. लस भेदभाव करत नाही तर लसीकरणात भेदभाव कशाला हे सरकारचे सूत्र आहे असे मोदी यांनी सांगितले.

कोरोना काळातील १९ महिन्यात मोदींनी देशवासीयांना केलेले हे १० वे भाषण होते. येत्या रविवारच्या (दि. २४) ‘मन की बात’ कार्यक्रमात याचा विस्तार एकायला मिळेल असे सांगितले जाते. 'कृतं मे दक्षिणे हस्ते जयो मे सव्य आहितः' या वेदवचनाने आपल्या भाषणाची सुरवात करून मोदी म्हणाले की भारताच्या संदर्भात बोलायचे तर कोरोना काळात देशाने एकीकडे कर्तव्यपालन केले तेव्हा दुसरीकडे त्याला (लसीकरणात) मोठा विजय मिळाला. १०० कोटी लसीकरणाचे कठीण उद्दिष्ट साध्य झाले कारण यामागे प्रत्येक देशवासीयाची शक्ती उभी होती. हा केवळ एक आकडा नसून हे प्रत्येक नागरिकाचे यश व देशाच्या सामर्थ्याचे ते प्रतीबिंब आहे.

देशात सणासुदीच्या तोंडावर चारी बाजूंना उत्साहाचे वातावरण आहे. देशविदेशातील तमाम अर्थसंस्था भारतीय अर्थव्यवस्थेबाबत अत्यंत सकारात्मक आहेत. देशात युवकांसाठी रोजगाराच्या संधी वाढत आहेत. ‘स्टार्टअप’चा विक्रम झाला आहे व गृहबांधणी क्षेत्रातही नवी उर्जा दिसत आहे. मागील काळातील सुधारणांमुळे भारताची अर्थव्यवस्था वेगाने अग्रेसर आहे असा दावाही पंतप्रधानांनी केला. क्रीडा क्षेत्र असो की मनोरंजन देशात सारीकडे ‘कुशल मंगल' आहे अशी भावना मोदींनी बोलून दाखविली.

मोदी म्हणाले...

- भारताच्या लसीकरणाच्या प्रयत्नांची जगात प्रशंसा होते आहे. मात्र काहीजणांनी यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांना देशवासीयांनीच काल उत्तर दिले.

- लस शोधणे व इतर देशांना ती देणे यात विदेशांचाच वरचष्मा होता. मात्र शतकातील या सर्वांत मोठ्या महामारीत भारतात उत्पादन होणारी लस यातील अनेक देश वापरत आहेत.

- या महामारीशी भारत लढू शकेल ? टाळी-थाळी वाजवून कोरोना पळून जाईल का? लस खरेदीसाठी सरकार पैसा कोठून आणणार ? लोक लस टोचून घ्यायला येणारच नाहीत. असे अनेक प्रश्न निर्माण केले गेले. मात्र भारताने १०० कोटी मोफत लसीकरण केल्यावर नागरिकांनीच त्यांना निरूत्तर केले आहे.

- महामारी काळात लोकांनी लसीकरणाकडे पाठ फिरविणे ही जगातील अनेक देशांसमोरची समस्या आहे. मात्र भारतीयांनी १०० कोटी लसीकरण साध्य करून जगालाही उत्तर दिले आहे.

- लसमात्रांच्या पुरवठ्याबाबत व एकूणच या मोहीमेत भारताने संपूर्म वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवला. प्रत्येक टप्प्यावरील आव्हानाला भारताने वैज्ञानिक दृष्टीनेच उत्तर दिले.

- ‘कोवीन ॲप’मुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला व आरोग्य क्षेत्रातील लोकांनाही लसीकरण सुलभ बनले.

- शेतकऱ्यांच्या गव्हाला आज विक्रमी भाव मिळत आहे. त्याचा पैसा थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर जमा होत आहे.

- दिवाळीचा सण भारतातील उद्योग-व्यवसायांसाठी मोठा असतो कारण वर्षभरात जेवढी विक्री -उलाढाल होते तेवढी या एका सीझनमध्ये होते. अगदी पदपतावरील छोट्या विक्रेत्यांसाठीही हा सण आशेचा किरण घेऊन आला आहे.

- सणाच्या काळातही देशवासीयांनी आरोग्य नियमांचे काटेकोर पालन करणे बिलकून सोडू नये. लढाई अजून सुरू आहे. त्यामुळे एवढ्यात हत्यारे टाकून चालणार नाही.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT