Bharat Gogawle- Aditi Tatkare Sarkarnama
पुणे

Raigad Guardian Minister : भरत गोगावले यांचे नाव घेत रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत आदिती तटकरेंचे भाष्य...

Aditi Tatkare Statement : असे काही जिल्हे आहेत की, तिथं एकपेक्षा जास्त मंत्री आहेत. त्यामुळे आपल्या जिल्ह्याचं आपण पालकमंत्री व्हावं. तशी भावना असण्यात काही गैर नाही किंवा चुकीचे काही नाही.

Vijaykumar Dudhale

Pune, 27 December : राज्यातील काही जिल्ह्यांत पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच होताना दिसत आहे. विशेषतः रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आग्रही असल्याचे दिसून येत आहे. रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी तर रायगडचा पालकमंत्री मीच होणार, असे जाहीर करून टाकली आहे. राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असे सांगितले जात आहे. मात्र महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी भरत गोगावले यांचे नाव घेत रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत भाष्य केले आहे.

पुण्यात दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी पालकमंत्रिपदाबाबत भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळालेल्या सर्वच मंत्र्यांची पालकमंत्री बनण्याची इच्छा असते. मात्र, असे काही जिल्हे आहेत की, तिथं एकपेक्षा जास्त मंत्री आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे सर्वांना वाटत असतं की आपल्या जिल्ह्याचं आपण पालकमंत्री व्हावं. तशी भावना असण्यात काही गैर नाही किंवा चुकीचे काही नाही.

राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे पालकमंत्रिपदाबाबत (Guardian Minister) योग्य तो निर्णय घेतील. जे पालकमंत्री होतील, त्यांनी त्या जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना एकत्रितपणे घेऊन काम करायचे आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांतच पालकमंत्रिपदाबाबतची घोषणा होईल. ती झाल्यानंतर जो तो आपल्या कामाला जबाबदारीने लागेल, असेही आदिती यांनी स्पष्ट केले.

तटकरे म्हणाल्या, पालकमंत्रिपदासाठी इच्छूक असण्यामध्ये काहीही गैर नाही. मंत्री झालो म्हटल्यानंतर पालकमंत्री होण्याची इच्छा बाळगणे यात काहीही गैर नाही. आमचे सहकारी आहेत...भरतशेठ...त्यांचीही पालकमंत्री बनण्याची इच्छा असणं, त्यात चुकीचं काही नाही. तेही चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आम्ही दोघंही मंत्री आहोत आणि रायगड जिल्हा पुढे कसा नेता येईल, त्यादृष्टीने आम्ही एकत्रितपणे काम करणार आहोत.

देशमुख कुटुंंबाना न्याय देणं, ही आमची सर्वांची भूमिका

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय देणे, जे आरोपी आहेत, त्यांना तातडीने पकडणे, त्यांच्यावर कठोर कारवाई करणे, आरोपींना शिक्षा मिळणे, ही आमची सर्वांची भूमिका आहे. दुसरी वेगळी भूमिका असण्याचे काही कारण नाही. बीडमधील घटनेचे कोणीही समर्थन करणार नाही. त्या घटनेवरून राजकारण होत असेल तर ते दुर्दैवी आहे. पण, ज्या घरातील व्यक्तींनी आपला पुत्र गमावला आहे. त्यांना न्याय देणे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणं, ही आमची सर्वांची भूमिका आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT