Eknath Shinde & Aaditya Thackeray
Eknath Shinde & Aaditya Thackeray  Sarkarnama
पुणे

Aaditya Thackeray : ''आमच्या सभेला जनतेची तर घटनाबाह्य,गद्दार मुख्यमंत्र्यांच्या सभेला खुर्च्यांची गर्दी..''

सरकारनामा ब्यूरो

Aaditya Thackeray On Eknath Shinde: वरळी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली होती.या सभेनंतर रिकाम्या खुर्च्यांचा फोटो, व्हिडीओ शेअर करत आदित्य ठाकरे व संजय राऊतांसह महाविकास आघाडीनं मुख्यमंत्र्यांसह शिंदेगटावर निशाणा साधला होता. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी आमच्या सभेला जनतेची तर घटनाबाह्य,गद्दार मुख्यमंत्र्यांच्या सभेला खुर्च्यांची गर्दी असा खोचक टोला वरळीतील सभेवरुन लगावला आहे.

चिंचवड पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नाना काटे(Nana Kate) यांच्या प्रचारार्थ आघाडीचा मेळावा चिंचवडला सोमवारी (दि.१३) झाला. यावेळी मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, काँग्रेसचे नाना पटोले तर ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी या तीनही नेत्यांनी भाजप आणि राज्यातील फडणवीस-शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली.

आदित्य ठाकरे म्हणाले, ही पोटनिवडणूक म्हणजे काट्याची नाही,तर काटेंशी टक्कर आहे. तसेच राज्यातील गलिच्छ राजकारणाविरुद्धचा तो लढा आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की गुजरातचे असा प्रश्न उपस्थित करतानाच या गद्दार सरकारला महाराष्ट्राला पुढे न्यायचेच नाही आहे असा आरोपही ठाकरेंनी यावेळी केला. तसेच या घटनाबाह्य गद्दार गॅंगवर उद्योजकांचा विश्वास न राहिल्याने ते बाहेर जात आहेत. हे उद्योग गुजरात व देशात इतरत्र गेल्याचे दुख नाही,तर राजकीय हेतूसाठी ते तिकडे पाठविले गेल्याचे दुख आहे असा हल्लाबोलही आदित्य ठाकरेंनी(Aaditya Thackeray) यावेळी केला.

राजीनामे देऊन माझ्या वरळी, मुंबई येथील मतदारसंघातून आपल्याविरुद्ध लढण्याचे आव्हान मुख्यमंत्र्यांनी न स्वीकारल्याने आता त्यांनी त्यांच्या ठाण्यातील मतदारसंघातून आपल्याविरुद्ध निवडणूक लढवावी असे आव्हानही आदित्य यांनी यावेळी दिले. यावेळी आम्ही खोक्याला हात लावला नाही, पण चाळीस आमदार आणि १३ खासदारांनी तो लावला नसल्याचे अजून सांगितलेले नाही,याकडे त्यांनी लक्ष वेधले. सभेतील गर्दीकडे बोट करीत आमच्या सभेला जनतेची गर्दी असते,तर घटनाबाह्य गद्दार मुख्यमंत्र्यांच्या(Eknath Shinde) सभेला ती खुर्च्यांची असते असा खोचक टोलाही आदित्य ठाकरेंनी यावेळी लगावला.

पन्नास खोके असं जो बोलतो त्याच्यावर लगेच धाड पडते असे सांगत केंद्र सरकारही सूडबुद्धीने वागत असल्याचे त्यांनी सांगितले.महाराष्ट्र पुढे जात असल्याचे न पाहवूनच भाजप(Bjp) ही महाशक्ती गद्दारांच्या मागे उभे राहिली असा आरोप करत आघाडीने राज्यपालांचा विषय लावून धरल्याने त्यांना पदावरून जावे लागले असेही ठाकरेंनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT