Ajit Pawar-Dhananjay munde
Ajit Pawar-Dhananjay munde Sarkarnama
पुणे

धनंजय मुंडेंनी अजित पवारांकडे बोलून दाखवली ही इच्छा!

सरकारनामा ब्यूरो

पुणे : ‘‘अजितदादा, तुमच्या आणि माझ्या वाढदिवसामध्ये सात दिवसांचं अंतर आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने मी गेली सात ते आठ वर्षांपासून हरिनाम सप्ताहाचे आयोजन करतो आहे. तुम्ही अनेकदा परळीला आला आहात, अभूतपूर्व कार्यक्रमही झाले आहेत. पण, एका तरी सप्ताहाच्या समाप्तीला विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आपण परळीत यावं. दादा, कधी कधी आमच्याही वाढदिवसाला हजेरी लावली, तर बरं होईल, ही इच्छा व्यक्त करतो,’’ अशा शब्दांत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याही वाढदिवसाच्या कार्यक्रमाला यावे, अशी अपेक्षा त्यांच्यासमोरच व्यक्त केली. (Ajit Dada should come to our birthday program too : Dhananjay Munde)

मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सामाजिक न्यायमंत्री मुंडे बोलत होते. ते म्हणाले, ‘‘मी २०१४ मध्ये विधानसभेला पडलो होतो. पण, माझ्यासारख्या पराभूत उमेदवाराला ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते केले. हे दुसरीकडे कोठे होत नाही, हे फक्त पवार यांनीच करावं. राष्ट्रवादीत जेवढी तरुणाई आहे, तेवढी तरुणाई दुसऱ्या कुठल्याही पक्षात नाही. कारण, अजित पवार यांच्यावर त्यांचा विश्वास आहे. अजित पवार जे बोलतात, ते करतात आणि जे बोलत नाहीत, तेसुद्धा करतात, हे तरुणाई जाणून आहे.’’

सुनील शेळके यांच्या आई-वडिलांना आज सर्वाधिक आनंद झाला असेल. कारण, तालुक्यातील हजारो लोक आज त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत. या प्रेमामुळेच शेळके यांना तालुक्यातील जनतेने ९४ हजार मतांची फरकांनी विजयी केले आहे. आपल्यातील काही जण कोविडमुळे गेले, त्याबद्दल संवेदना व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यातून आलेले पाणी पाहून ते किती संवदेनशील आणि कार्यकर्त्यांना जपणारे आहेत, हे समजते, असे मुंडे म्हणाले.

सामाजिक न्यायमंत्री म्हणाले की, अजित पवार राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आले. सुनील शेळके पहिल्यांदा निवडणूक लढवत असताना ते ९४ हजार मतांनी निवडून आले. नीलेश लंके हे ६४ हजार मतांनी निवडून आले. मी निवडून येणार आहे की नाही, हे कुणालाच माहित नव्हतं. पण, मीही ३२ हजार मतांनी निवडून आलो. माझी लढाई जरा वेगळीच होती. आमच्यात अजित पवार आणि राष्ट्रवादीने काय पाहिलं हे आम्हाला माहीत नाही. पण ही माणसं विश्वास तोडणार नाहीत, हे त्यांनी ओळखलं असावं. म्हणून ही ताकद त्यांनी आम्हाला दिला असावी.

महाविकास आघाडी सरकार आल्यापासून वेगवेगळी संकटे येत आहेत. अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडला आणि त्यानंतर आठच दिवसांत लाॅकडाऊन लागला. कुणाचा कुणाला मेळ नाही. महाराष्ट्रासह सर्व जग संकटात होते. पण या संकटातसुद्धा पवार यांनी आपल्या राज्याची आर्थिक घडी विस्कटू दिली नाही. त्याला शिस्तच लागते आणि दादांकडे शिस्तीशिवाय काही नाही, ,असे मुंडे म्हणाले.

केंद्रात भाजपचं सरकार आहे. मला भाजपवाल्यांना एकच सांगायचं आहे की, तुम्ही अजित पवार यांच्या मागे ईडी लावली, सीबीआय लावलं आणि इन्मक टॅक्स लावलं. काहीही ठेवलं नाही; पण त्यांना काहीही मिळालं नाही. या ईडीची चव एवढी घालवू नका की आमच्या मराठवाड्यातील शेतमजूरही खिशात बिडी ठेवतो, तिचीसुद्धा ऐपत जास्त असते. भाजपवाल्यांनी कितीही प्रयत्न केला, तर काही उपयोग होणार नाही. मावळ तालुका तर सुनील शेळके यांनी पार साफ करून टाकला आहे. आगामी निवडणुकीत राज्यातसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष म्हणून पुढे येईल, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT