Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक आणि बिनधास्त विधानांसाठी ओळखले जातात. प्रचंड बहुमत,मोठा गाजावाजा करत सत्तेवर आलेलं महायुती सरकारमध्ये पडद्यामागं खूपकाही घडत असल्याची चर्चा आहे. पण या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) मात्र मोठं विधान केलं आहे. यावेळी त्यांनी महायुती सरकारची 24 तासांची शिफ्टच सांगून टाकली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.25) एका कार्यक्रमात बोलताना महायुतीचं सरकार 24 तास काम करतं असल्याचं विधान केलं. एवढ्यावरच थांबतील ते अजितदादा कसले. त्यांनी पुढं जात राज्यातील महायुती सरकार हे 24 तास काम करत असून,झोपणारे हे ठराविक वेळेत झोपत असतात. मी पहाटे चार वाजता उठतो,माझं सकाळी चालणं अन् व्यायाम झाला की, पहाटे चारपासून कामाला सुरुवात करतो,तर रात्री 10 वाजेपर्यंत माझं काम हे सुरू असतं.
यानंतर रात्री 11 ते 2 यावेळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं काम सुरू होतं. 2 ते 4 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम करत असतात,असं आमच्या महायुती सरकारचं (Mahayuti Government) 24 तास काम सुरू असल्याचं अजितदादा म्हणाले. आमच्या 24 तासांच्या काम करण्याच्या पध्दतीमुळे अधिकाऱ्यांची मोठी पंचायत होत असल्याचा मिश्किल टोलाही अजित पवार यांनी यावेळी लगावला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते राज्य कुटुंब कल्याण भवन आणि प्रशिक्षण केंद्र या इमारतीचा भूमिपूजन आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत नवीन 20 दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या कार्यशैलीवर भाष्य केलं.
अजित पवार म्हणाले,जनतेची उत्तमप्रकारे सोय करणारे काम महायुती सरकार करत असून पुढच्या दोन-तीन वर्षांमध्ये या सर्व इमारतींचं काम पूर्ण झालं पाहिजे. आपल्याला सरकारी कार्यालय चांगलं करण्याची आवड असून तिथे येणाऱ्या नागरिकांना चांगल्या सोयीसुविधा मिळायला हव्यात. लोकांसाठी आरोग्याच्या सगळ्या सुविधा एका छताखाली आणण्याचं काम सुरु असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
अजित पवारांनी यावेळी तनिषा भिसे मृत्यूप्रकरणावरही प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले, दीनानाथ मंगेशकरमध्ये उपचार न मिळाल्यानं मृत्यू झाला,यामुळे संपूर्ण समाजाच्या मनावर जखम झालीय. ही घटना म्हणजे आरोग्ययंत्रणा कशा पद्धतीनं त्रुटी आहेत हे अधोरेखित करते. याची उच्चस्तरीय चौकशी सुरू केलीय. जे दोषी आहेत,त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्या महिलेला न्याय मिळवून देण्याचं काम सरकार करणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचं विधान केलं आहे. ते पुण्यातील एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी मुंबईत गेल्यावर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'पुन्हा एकदा एक पुस्तक' लिहायचा सल्ला देणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते असताना अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा, असं एक पुस्तक लिहिलं आहे. आता त्यांना फडणवीस यांना तुम्ही दुसरं पुस्तक लिहा, त्याचं नाव द्या 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.