ajit pawar  sarkarnama
पुणे

Ajit Pawar : मनमोहन सिंग यांच्या काळातच पुण्याची मेट्रो मंजूर! अजितदादांनी एका फटक्यात श्रेयवादाचा मुद्दा काढला निकाली; नेमकं काय घडलं?

Pune Metro approved during Manmohan Singh tenure : पुणे मेट्रो प्रकल्पाला मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात मंजुरी मिळाली होती, असे स्पष्ट करत अजित पवारांनी श्रेयवादाचा मुद्दा निकाली काढला.

सरकारनामा ब्युरो

डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळात पुणे मेट्रो मंजूर झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांच्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मी राज्य सरकारमधून मेट्रोला मदत देत आहोत, असे सांगत ‘मेट्रो आम्हीच आणली’ असा दावा करणाऱ्या भाजपला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरसा दाखविला. याशिवाय महापालिकेतील मूलभूत प्रश्नांकडे दोन्ही महापालिकांमधील कारभाऱ्यांनी दुर्लक्ष केले, अशी टीकाही पवार यांनी केली.

महापालिका निवडणुकीसाठी पुण्यातील पाच प्रश्‍नांवर जागृती करणारी ‘अलार्म’ मोहीम पक्षाने सुरू केली. त्याची माहिती पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी विविध प्रश्‍नांना उत्तरे देताना भाजपची पोलखोल केली. 5 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील सभेत ‘मागील पाच वर्षांत आम्ही काय केले, हे विचारत असतील तर त्यांनी आरसा बघावा’ अशी टीका करत अप्रत्यक्ष पवार यांच्यावर निशाणा साधला होता. यावर अजित पवार यांनी प्रत्युत्तर देत भाजपला आरसा दाखवला.

नवीन महापालिकांबाबत पवार म्हणाले, ‘‘शहराचा विस्तार चारही दिशांना होत असून, लोकसंख्येतही मोठी वाढ होत आहे. सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील वाढती लोकसंख्या पाहता जिल्ह्यात दोन नवीन महापालिका होऊ शकतात. हडपसरच्या पुढील भागांचा समावेश करून चाकण आणि आळंदी-वाघोली या भागासाठी दोन महापालिका होऊ शकतात. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यानंतर दोन महापालिका केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे व पिंपरी-चिंचवडमधील कारभाराबाबत पवार म्हणाले, महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी अनागोंदी कारभार केला आहे. दोन्ही शहरांमधील ढासळलेल्या नागरी पायाभूत सुविधांबद्दल नागरिकांमध्ये असंतोष वाढल्यानेच ‘अलार्म’ मोहीम सुरू केली आहे. वाहतूक, कचरा, पाणी, प्रदूषण या प्रश्‍नांची गंभीर स्थिती झाल्याचा हा अलार्म आहे. ते सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तसेच सत्तेत आल्यास ‘बीडीपी’चा प्रश्‍न मार्गी लावू, असेही आश्वासन त्यांनी दिले.

‘खर्च केलेला निधी गेला कुठे?’

महापालिकेची सत्ता असणाऱ्यांनी नऊ वर्षांत ७५ हजार कोटी पुण्यातील विकासकामांवर खर्च केले. मात्र, शहरात कुठेच ठोस विकासकामे दिसत नाहीत. मग खर्च केलेला निधी गेला तरी कुठे? असा प्रश्‍न अजित पवार यांनी भाजपसमोर उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT