Mahesh Landage, Ajit Pawar
Mahesh Landage, Ajit Pawar sarkarnama
पुणे

अजितदादांनी ज्यांना महापौर आणि आमदार केले त्यांनीच राष्ट्रवादीचा करेक्ट `कार्यक्रम` केला...

सरकारनामा ब्युरो

पिंपरी : राज्यातील सत्तांतरानंतर राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा काल प्रथमच पिंपरी-चिंचवडचा (Pimpari-Chinchwad) दौरा केला. यावेळी `निर्धार महाविजयाचा संवाद कार्यकर्त्यांचा` या पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या संवाद सभेत मार्गदर्शन करताना त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. या सभेत पक्षाचे स्थानिक नेते भाऊसाहेब भोईर यांचे भाषण दादांसह सर्वांनाच हसवून गेले. तसेच ते सर्वांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारेही ठरले.

अजितदादांनी ज्यांना महापौर केलं, आमदार केलं, त्यांनीच करेक्ट कार्यक्रम केला अशी खंत भोईर यांनी व्यक्त केली. त्यामुळे अजितदादांना किती वेदना झाल्या असतील, याचा विचार करा, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानाचा रोख हा २०१७ ला पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १५ वर्षांची राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता घालविणाऱ्या पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीतील महेश लांडगे (Mahesh Landge) व लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) या सध्याच्या भाजप आमदारांच्या दिशेने होता. दादांभोवतालचं हे कोंडाळं खतरनाक होतं. त्यांनी माझाही `कार्यक्रम` केला, असे त्यांनी सांगितले. या लोकांना दादांनी दिलेले प्रेम आणि पदे यांचे त्यांना अजीर्ण झाले असा हल्लाबोल त्यांनी केला. नेत्यांसमोर कार्यकर्त्यांनी हे बोललं पाहिजे, असेही ते म्हणाले.

काल भोईर यांचा वाढदिवस होता. यावेळी बोलताना त्यांनी स्वतःच सर्वांकडून शुभेच्छा घेतल्या, त्यावर दादांसह उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली. दादांनी अनेक कार्यकर्ते मोठे केले. त्यांच्यामुळेच व्यासपीठावर आपण सर्व आहोत, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली. भाषणाची सुरुवातच त्यांनी दणकेबाज केली. व्यासपीठावरील उपस्थितांची नावे घेत नाही, असे ते म्हणाले. त्यामागील कारण सांगताना एखादे नाव न घेतलेला दुखावला जाऊन निवडणुकीत काय कार्यक्रम करेल हे सांगता येत नाही, असे ते म्हणताच हास्यस्फोट झाला. नंतर त्यांचे भाषण गंभीर झाले. त्याने उपस्थितांना आत्मचिंतन करायला भाग पाडले.

भाजपने असे काय कार्य केले की २०१७ ला त्यांना पिंपरी-चिंचवड शहराने भरभरून मते दिली, मोदी व शहा न येताही त्यांची सत्ता आली. त्याचे कारण अजितदादांनी काही चुकीच्या माणसांवर खूप प्रेम केले. त्यांच्या हाती सत्ता दिली. आपलेच लोक तिकडे गेले अन महापालिकेत भाजपचे तीन नगरसेवक निवडून यायचे तिथे त्यांची २०१७ ला सत्ता आली. याचे आत्मपरिक्षण केलं पाहिजे, असेही भोईर कळकळीने म्हणाले.

तीनचा प्रभाग चारच्या करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरही भोईर यांनी उपरोधिक भाष्य केले. तीन, चार कशाला करता, अन कशाला निवडणूक घेता. अमित शहांना तिकडे बसवून सगळेच नगरसेवक तुमचे करा, असा टोला त्यांनी लगावला. देशाने पहावे असे शहर भाजपने नाही, तर अजितदादांनी केले, असे ते म्हणाले. तसेच अजितदादांना भावी मुख्यमंत्री म्हणायचं अन घरी झोपा काढायच,असे नाही चालत असे म्हणत त्यांनी आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचेही कान टोचण्यास कमी केले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT