Amol Kolhe, Renuka Singh
Amol Kolhe, Renuka Singh sarkarnama
पुणे

'शिरूर'मध्ये विकास दिसेल; केंद्रीय मंत्री रेणुकासिंहच्या दौऱ्याचे कोल्हेंनी केले स्वागत

उत्तम कुटे- सरकारनामा ब्युरो

पिंपरी : विरोधी पक्षांचे खासदार असलेल्या देशातील १४४ जागांवर २०२४ ला विजय मिळवण्याचा चंग भाजपने आतापासूनच बांधला आहे. त्यात १६ पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरुरसह १६ मतदारसंघ हे महाराष्ट्रातील शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) आहेत. तेथे दौरे करण्यास भाजपच्या (BJP) केंद्रीय मंत्र्यांनी सुरवातही केली आहे. केंद्रीय आदीवासी राज्यमंत्री रेणुकासिंह या येत्या बुधवारपासून (ता.१४) तीन दिवस शिरूरमध्ये येणार आहेत.

बारामती जिंकण्याच्या भाजपच्या दाव्यावर पवार कुटुंबियांनी जसे त्यांचे बारामतीत स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया दिली. तशीच ती शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनीही आज दिली आहे. पण, ती देताना त्यांनी भाजप व त्यांच्या मंत्र्यांना कोपरखळी मारली आहे. त्यांना शिरुरमध्ये विकासच दिसेल, तरीही त्यांनी या मतदारसंघातील शेतकरी, आदीवासींचे प्रलंबित प्रश्न कॅबिनेटमध्ये मांडावेत आणि शिवनेरी किल्यावर शंभर फुटी भगवा फडकावण्याची मी संसदेत केलेली मागणी पूर्ण होईल, हे पहावे असा टोला लगावला आहे.

भाजपने लक्ष्य केलेल्या विरोधकांच्या सर्व १४४ मतदारसंघांमध्ये विजयश्री खेचून आणण्याच्या दृष्टीने पुढील अडीच वर्षांचे सुक्ष्म नियोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रेणुकासिंह या लोकसभा प्रवास योजनेंतर्गत शिरुरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिरूरच्या निवडणूक प्रभारी आणि पुण्यातील भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये काल (ता.११) पत्रकारपरिषदेत शिरूरमध्ये २०२४ ला पक्षाचा विजय निश्चित असल्याचा दावा केला.

त्यावर कोल्हे यांनी वरील टोलेबाजी आज आपल्या फेसबुक पेजवर केली. निवडणूक म्हणून दौऱ्यावर येऊ नका, तर येथील आदीवासींच्या बाळहिरडा खरेदीचा अनेक वर्षे न सुटलेला प्रश्न आदीवासी मंत्री म्हणून सोडवा, १८ रुपये प्रतिकिलोसाठी खर्च येणारा कांदा हा उत्पादक शेतकऱ्याला आठ-दहा रुपये प्रतिकिलोने विकावा लागत आहे.

त्यासाठी कांद्यावरील निर्यातबंदी उठवा, त्यावरील निर्यात कर घटवा अशी मागणी कोल्हें यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे त्यांच्या दौऱ्यानिमित्त केली आहे. शिवनेरीवर शंभर फूटी भगवा ध्वज फडकावण्याची मागणी लोकसभेत स्थानिक खासदार म्हणून केली आहे. राज्याच्या अस्मितेचा हा प्रश्न व मतदारसंघातील आदीवासी व शेतकऱ्यांचे इतर प्रश्न कॅबिनेटमध्ये मांडून ते सोडवा, असेही त्यांनी रेणुकासिंह यांना सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT