Eknath Shinde Sarkarnama
पुणे

Eknath Shinde Speech : मोदींनी नऊ वर्षांत केलेल्या कामाची पोचपावती म्हणजे टिळक पुरस्कार; मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे कौतुक

सरकारनामा ब्यूरो

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षांत केलेल्या कामाला आज लोकमान्यता मिळाली आहे. लोकमान्य टिळकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. पण, स्वातंत्र्याचे सुराज्य किती झाले, हे आपल्याला माहिती आहे. मोदी यांनी गेल्या नऊ वर्षांत आपल्या कामाने देशात सुराज्य निर्माण करण्याचे काम केले आहे. गेल्या नऊ वर्षांत मोदी यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणजे त्यांना मिळालेला टिळक पुरस्कार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. (Appreciation of Prime Minister narendra modi by Chief Minister Eknath Shinde)

पुण्यातील टिळक स्मारक समितीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बोलत होते. या वेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, दीपक टिळक, रोहित टिळक आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लोकमान्य टिळक यांच्या नावाचा राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज मिळणार आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. हा पुरस्कार इंदिरा गांधी, डॉ मनमोहनसिंग, प्रणव मुखर्जी, विजय भटकर यांच्यापासून उद्योजक, संशोधन, राजकारणी अशा अनेकांना मिळालेला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही हा पुरस्कार दिलेला आहे. जनतेसाठी चांगले काम करणाऱ्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

टिळक पुरस्कारासाठी जागातिक नेतृत्व नरेंद्र मोदी यांना निवडले, त्याबद्दल टिळक स्मारक समितीचे आभार मानतो. नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षांत केलेल्या कामालाही लोकमान्यता मिळालेली आहे. टिळकांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. पण, स्वातंत्र्याचे सुराज्य किती झाले, हे आपल्याला माहिती आहे. त्यांनी गेल्या नऊ वर्षांत आपल्या कामाने सुराज्य निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यामुळे गेल्या नऊ वर्षांत मोदी यांनी केलेल्या कामाची पावती म्हणजे टिळक पुरस्कार आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

शिंदे म्हणाले की, जगात मोदींचा सर्वत्र कौतुक होत असताना आपल्या देशानेही त्यांचे कौतुक केले पाहिजे. जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था डळमळीत होत असताना मोदी यांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या स्थानावर आली आहे. लोकमान्यांनी स्वदेशाची नारा दिला, तर मोदींनी आत्मनिर्भर बनण्याची घोषणा केली. मोदी हे लोकमान्य टिळकांचा उपदेश अंमलात आणत आहेत.

मोदींनी एकदा ठरवलं की ते काहीही झाले तरी ते काम करतात. जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटवण्यापासून आयोध्येत राम मंदिर उभारणीपर्यंत केलेली कामे, वाराणसीचा कायापालट असो अथवा देशातील गरिबांच्या कल्याणचे काम ही त्याची मूर्तीमंत उदाहारणे आहेत. देशाला सामर्थ्यवान बनविण्याचे स्वप्न टिळकांनी पाहिले. मोदी त्यादृष्टीनेच वाटचाल करीत आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले, त्याचा आम्हाला अभिमान आहे. देशाच्या प्रगतीचा ध्यास घेतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुलंद भारताचे स्वप्न प्रत्याक्षात आणण्याचे काम करत आहेत. त्यामुळे आता मोदींना लोकमान्यांचे आशीर्वाद, बळ आणि ताकद मिळणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT