Sambhaji Raje-Ashok Pawar
Sambhaji Raje-Ashok Pawar Sarkarnama
पुणे

संभाजीराजे स्मारकाचा निधी रद्द करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारला अशोक पवारांचा इशारा

भरत पचंगे

शिक्रापूर (जि. पुणे) : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने २७० कोटींचा निधी छत्रपती संभाजी महाराजांच्या (Sambhaji Maharaj) जागतिक दर्जाच्या स्मारक उभारणीसाठी मंजूर केले होते. मात्र, सत्तेत आल्यावर हे काम रद्द केले नसल्याचे सांगणाऱ्या शिंदे (Eknath shinde)-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने त्यांच्या पहिल्याच अधिवेशनात शंभूभक्तांची साफ निराशा करून आपल्या गोटातील आमदारांच्या मतदारसंघांना निधीची खैरात केली आहे. स्मारकाच्या निधीचा विषय मी सभागृहात उपस्थित केला होता. शिंदे-फडणवीस सरकारने स्मारकासाठी तत्काळ निधी द्यावा; अन्यथा संपूर्ण शिरुर-हवेली मतदारसंघातील नागरिकांसह आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांनी दिला. (Ashok Pawar's warning to the Shinde-Fadnavis government for canceling Sambhaji Raje memorial fund)

छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक मार्च २०२५ पर्यंत उभारणीसाठी महाविकास आघाडी सरकारने २७० कोटी रुपये मंजूर करून विकास आराखडाही तयार केला होता. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने तो निधी रद्द केला. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी हे काम रद्द केले नसल्याचे सांगूनही या कामासाठी अधिवशेनात निधीची तरतूद केली नाही. हिंदू दैवताच्या स्मारकाबद्दल असे वागणाऱ्या सरकारने विधानसभेतही माझ्या औचित्याच्या मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न केल्यास आपण गप्प बसणार नाही. थेट आंदोलनाचे पाऊल उचलले जाईल, असा इशाराही पवार यांनी दिला.

महाविकास आघाडी सरकारकडून हवेली तालुक्यातील वढू बुद्रूक आणि तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतिस्थळी जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला हेाता. त्यासाठी २६९ कोटी २४ लाख रुपये निधीची तरतूद केली होती. मात्र, सरकार बदलल्यावर शिंदे-फडणवीस सरकारकडून मविआ सरकारची अनेक मंजूर कामे रद्द करण्यात आली. त्यात वढु बुद्रूकचेही काम होते. मात्र, या कामाबद्दल आक्षेप नोंदविले गेल्यानंतर शिंदे-फडणवीस यांनी स्वत: जाहीर केले की, हे काम रद्द केलेले नाही. मात्र, नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आपल्या गटातील आमदारांच्या कामाला निधी देताना वढू बुद्रूकच्या कामाच्या मंजुरीबाबत मात्र कार्यवाहीच होत नसल्याचे पाहून अधिवेशनाच्या शेवटचे दिवशी आमदार अशोक पवार यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यात त्यांनी या कामाच्या विकास आराखड्यासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी लावून धरली. या प्रकरणी सरकारकडून चालढकल, दुर्लक्ष तसेच टाळाटाळ होत असल्याने वढु बुद्रुक ग्रामस्थांच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर आमदार पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

आमदार पवार म्हणाले की, संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळाबाबत सरकारकडून टाळाटाळ होत असेल तर आपण गप्प बसणार नाही. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या प्रकरणाचे गांभिर्य निदर्शनास आणून दिले आहे. मविआ सरकारचे चांगले निर्णय रद्द केले जात असतील तर विरोधी पक्षांच्या वतीने या कामासाठी पाठपुरावा करण्यात येईल. निधीची तरतूद न केल्यास आंदोल करण्यात येईल, असा इशाराही पवार यांनी दिला. दरम्यान, वढू बुद्रूकचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, अंकुश शिवले, अनिल शिवले, माजी उपसरपंच रमाकांत शिवले, ग्रामपंचायत सदस्य माऊलीआप्पा भंडारे, कृष्णा आरगडे आदींच्या शिष्ठमंडळासोबत बोलताना पवार यांनी ही माहिती दिली.

पुलासाठीही अशोक पवार आग्रही

वढू बुद्रूक समाधीस्थळी ये-जा करण्यासाठी वाघोली-भावडी-तुळापूर-आपटी या ५ किलोमीटर रस्त्यासाठी ३५ कोटी आणि वाघोली-भावडी-तुळापूर-आपटी रस्त्याच्या दरम्यान भीमा नदीवरील पुलासाठी ४० कोटी अशा एकुण ७५ कोटींची स्वतंत्र मागणी आपण केली आहे. त्याला निधी मिळावा, यासाठी अशोक पवारांचे प्रयत्न सुरू आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT