BJP News Sarkarnama
पुणे

Assembly Elections Results: भाजपच्या विजयाचा पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष; मात्र आमदार गायब...

Ganesh Thombare

चैतन्य मचाले :

Pune News: भारतीय जनता पक्षाला (BJP) तीन राज्यांच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयाचा जल्लोष पुणे शहर भाजपच्या वतीने रविवारी साजरा करण्यात आला. शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आनंदोत्सवात कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, शहरातील एकाही आमदाराने यासाठी उपस्थिती न लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरात भाजपचे पाच आमदार असून, त्यापैकी कोणीही या वेळी उपस्थित राहिले नाही.

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांचे निकाल रविवारी जाहीर झाले. यामध्ये मतदारांनी तीन राज्यांत भाजपला स्पष्ट बहुमत दिले. या निकालानंतर देशातील अनेक शहरात भाजपकडून विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे.

पुणे शहर भाजपच्या वतीने जल्लोष करून हा विजय साजरा करण्यात आला. गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावर असलेल्या गुडलक चौकात हा उत्सव झाला. ढोल ताशाचा गजर, गुलालाची उधळण करत मोदी सरकारचा जयघोष या वेळी केला जात होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपचे प्रभारी माधव भंडारी, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश सचिव वर्षा डहाळे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, वर्षा तापकीर, रवींद्र साळेगावकर, राहुल भंडारे, उपाध्यक्ष प्रमोद कोंढरे, प्रिया शेंडगे, गायत्री खडके, राजेंद्र काकडे, गणेश बगाडे या वेळी उपस्थित होते.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात विजयाचा हा उत्सव होत असताना शिवाजीनगरसह शहरातील पक्षाचा एकही आमदार यामध्ये सहभागी झाले नसल्याचे दिसून आले. पुणे शहरात आठ आमदार असून त्यापैकी पाच आमदार हे भाजपचे आहेत, तर उर्वरित तीनपैकी दोन आमदार राष्ट्रवादी काँग्रेस, एक आमदार काँग्रेसचे आहेत.

भाजपला तीन राज्यांत मिळालेला हा विजय आगामी लोकसभा निवडणुकीची नांदी असल्याच्या प्रतिक्रिया भाजपकडून व्यक्त केल्या जात आहेत. असे असतानाच शहरात साजरा करण्यात आलेल्या या विजयाच्या उत्सवात पक्षाचा एकही आमदार सहभागी झाला नसल्याने त्याची उलटसुलट चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.

भाजपला मिळालेल्या यशाबद्दल बोलताना पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वावर जगाने शिक्कामोर्तब केले आहे. केंद्रातील भारतीय जनता पार्टी सरकार हे जनतेचे सरकार आहे. पक्षाला मिळालेला विजय हा तीन राज्यांतील लोकसभा निवडणुकीच्या विजयाची नांदी आहे."

(Edited by- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT