मंचर (पुणे) : गेल्या काही दिवसांपासून भीमाशंकर विकास आराखड्याला ‘खेड-आंबेगाव’ असे संयुक्त नाव देण्याच्या चर्चेमुळे स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे. यावर लोकप्रतिनिधींमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
भीमाशंकर विकास आराखड्याच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून खेड आणि आंबेगाव तालुक्यात लोकप्रतिनिधीमध्ये वाद रंगला आहे. विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
खेड येथे आमदार बाबाजी काळे यांच्या निवासस्थानी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
वळसे पाटील यांनी समोर येत “खेड-आंबेगावमध्ये कोणताही संघर्ष नाही. काही जण मुद्दाम राजकीय वातावरण तापवून जनतेची दिशाभूल करत आहेत,” असा आरोप केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत नुकतीच भीमाशंकर विकास आराखड्याबाबत महत्त्वाची बैठक झाली होती. त्या बैठकीत विकास आराखड्याच्या नावासंदर्भात चर्चा झाली. स्थानिक भावना लक्षात घेऊन आमदार बाबाजी काळे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपली भूमिका मांडली होती.
वळसे पाटील म्हणाले, “हा केवळ नावाचा प्रश्न नाही, तर वस्तुस्थिती समजून घेण्याचा विषय आहे. भीमाशंकर मंदिर भौगोलिकदृष्ट्या खेड तालुक्यात येते, हे वास्तव कोणी नाकारू शकत नाही. मात्र मंदिर परिसरातील अनेक सुविधा, वाहतूक व्यवस्था, बाजारपेठ आणि सामाजिक संबंध आंबेगाव तालुक्याशी जोडलेले आहेत. त्यामुळे विकास आराखड्याला संयुक्त नाव देण्याचा विचार पुढे आला. यात कुठेही तालुक्यांमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा हेतू नाही.”
राजकीय टोलेबाजी करताना वळसे पाटील यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. “काही लोकांना स्वतः काही काम करायचे नसते. दुसऱ्यांनी केलेल्या प्रत्येक कामात अडथळे आणणे आणि चुकीच्या गोष्टी पसरवणे, हीच त्यांची पद्धत झाली आहे. अशा प्रवृत्तीकडे मी फारसे लक्ष देत नाही,” असे ते म्हणाले.
त्याचवेळी त्यांनी आमदार बाबाजी काळे यांच्या कामाचे खुलेपणाने कौतुक केले. “बाबाजी काळे यांनी परिसरातील अनेक विकासकामांना गती दिली आहे. नव्या रस्त्यांसह विविध प्रकल्प मंजूर करून घेतले. विकासाच्या कामाला श्रेय द्यायला हवे. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणे योग्य नाही,” असे सांगत त्यांनी काळेंना पाठबळ दिले.
विरोधकांकडून ‘खेडच्या भावनांकडे दुर्लक्ष’ होत असल्याचा आरोप होत असताना वळसे पाटील यांनी आपल्या खेड तालुक्याशी असलेल्या भावनिक नात्याचाही उल्लेख केला. “माझे जन्मगाव आणि आजोळ खेड तालुक्यातील मोहकल येथे आहे. त्यामुळे खेड तालुक्याबद्दल माझ्या मनात कायम आदर आणि प्रेम आहे,” असे ते म्हणाले.
मंत्री किंवा लोकप्रतिनिधी हे फक्त एका तालुक्यापुरते मर्यादित नसतात. “एकदा लोकांनी निवडून दिल्यानंतर संपूर्ण राज्याचा विचार करणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
वळसे पाटील यांनी कळमोडी धरण आणि परिसरातील पाणीप्रश्नावरही सविस्तर भूमिका मांडली. “कळमोडी धरण खेड तालुक्यात आहे, पण त्याचे पाणी विविध भागांना दिले जाते. जलसंपत्ती ही एका भागाची मक्तेदारी नसते. अनेक वर्षांपासून विविध गावांना पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत,” असे ते म्हणाले.
राज्य सरकारने नव्या पाणी योजनेलाही मंजुरी दिल्याची माहिती देत त्यांनी सांगितले की, या प्रकल्पाचा फायदा आदिवासी भागांसह खेड आणि आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांना होणार आहे.
भीमाशंकर विकास आराखड्याच्या मुद्द्यावरून सध्या खेड आणि आंबेगावच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण निर्माण झाले आहे. वळसे पाटील यांच्या पत्रकार परिषदेनंतर हा वाद आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्याला राजकीय रंग चढण्याची चिन्हे दिसत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.