Mahavitaran
Mahavitaran Sarkarnama
पुणे

PCMC News : भाजप अन् अदानींच्या कारभारामुळेच साडेतीन लाख घरे अंधारात; राष्ट्रवादीचा हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो

Pimpri-Chinchwad NCP Attack on BJP : पुणे, पिंपरी-चिंचवडमधील साडेतीन लाख घरांतील वीज गुरुवारी (ता. १८) सायंकाळपासून गायब होती. ऐन उन्हाळ्यात १४ तास वीज बंद झाल्याने १४ लाख रहिवाशांची मोठी होरपळ झाली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी (ता. १९) भाजप आणि अदानी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

'पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड'च्या ४०० केव्हीच्या अतिउच्चदाब वीजवाहिन्यांच्या देखभाल, दुरूस्तीची जबाबदारी अदानी कंपनीकडे आहे. मात्र या कंपनीकडून त्याकडे दुर्लक्ष केले. या बेजबाबदारपणामुळे गुरुवारी रात्री साडेतीन लाख ग्राहकांवर अंधारात राहण्याची वेळ आली. भाजप आणि अदानींच्या कारभारामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड (PCMC) शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला.

यावेळी गव्हाणे म्हणाले, "अदानी कंपनीला हे देखभाल दुरुस्तीचे काम भाजप (BJP) नेत्यांच्या आशिर्वादाने मिळाले आहे. त्यांचा वरदहस्त असलेल्या या कंपनीने हा बिघाड तात्काळ दुरुस्ती करणे अपेक्षित होते. मात्र त्याकडे संबंधित कंपनीने दुर्लक्ष केले. परिणामी ऐन उन्हाळ्यात नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. त्याची जबाबदारी भाजपने स्वीकारावी. सरकारने अदानी कंपनीवर कडक कारवाई करावी."

गव्हाणे (Ajit Gavhane) यांनी सुमारे साडेतीन लाख नागरिकांना फटका बसल्याचा दावा केला. ते म्हणाले, "या बिघाडामुळे ३९६ मेगावॅट विजेचा पुरवठा बंद झाला होता. त्यामुळे पुण्यातील खराडी, वडगाव शेरी, विमाननगर, येरवडा, धानोरी आदी परिसरातील सव्वालाख, तर पिंपरी-चिंचवडमधीलल पिंपरी, चिंचवड, पुनावळे, वाकड, वाल्हेकरवाडी, ताथवडे, किवळे, रावेत, थेरगाव परिसर आणि संपूर्ण प्राधीकरणासह आकुर्डीमधील २ लाख ३० हजार अशा एकूण ३ लाख ५५ हजारांवर ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली."

वीज पुरवठा खंडीत झाल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले. त्याची भरपाई आदानी कंपनीकडून घेण्याची मागणीही गव्हाणे यांनी केली आहे. गव्हाणे म्हणाले, "पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad), चाकण,तळेगाव एमआयडीसीतील पाच हजार औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा या बिघाडामुळे बंद पडला. त्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्याची भरपाई अदानी कंपनीकडून घ्यावी."

महावितरणची कबुली

वीजबिघाडामुळे तीन लाख ५५ हजार ग्राहकांचा गुरुवारी (ता. १८) सांयकाळी सात वाजून दहा मिनिटांना खंडित झाला होता. तो वीजपुरवठा शुक्रवारी (ता. १९) सकाळी आठ वाजून ५५ मिनिटांनी म्हणजे १२ तासांनी पूर्ववत झाल्याची लेखी कबुली महावितरणनेच दिली. त्याचा फटका काल रात्री व आज या बिघाडामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडमधील वीज न गेलेल्या भागांना आज बसला. कारण तेथील वीज दुसऱ्या भागात वळविली होती. परिणामी या भागात एक-दोन तास विनासूचित सक्तीने भारनियमन आज केले गेले. ते ही महावितरणने मान्य केले. तळेगावजवळ करंजविहिरे येथे अतिउच्चदाबाची एक वाहिनी तुटून दुसऱ्या वाहिनीवर पडल्याने कालचा हा जंबो बिघाड झाल्याचे आढळून आले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT