Pune BJP Vs Congress on Pune traffic jam issue : पुणे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाल्याने काँग्रेसने काल घोड्यावरून रपेट असे आंदोलन केले होते. त्यावर घाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे टीका केली आहे.
काँग्रेसच्या नेतृत्वातील दूरदृष्टी व इच्छाशक्तीचा अभाव, नियोजनशून्य कारभार आणि राजकीय उदासीनता यामुळे पुणेकरांना सध्याच्या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केली.
शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) म्हणाले, शहरातील वाहतुकीची कोंडी नियंत्रणात आणावी यासाठी 1987च्या विकास आराखड्यात एचसीएमटीआर हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता. शहर आणि उपनगरांना 38 किलोमीटरच्या मार्गाने जोडण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. परंतु काँग्रेसच्या सत्ता काळात त्यांना या प्रकल्पाला साधी मान्यताही देता आली नाही. वाहतुकीची कोंडी बिकट होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. महायुती सरकारने नुकतीच या प्रकल्पाला मान्यता दिली आहे.
याशिवाय 'पुणे महापालिका क्षेत्रातील उड्डाणपुलासाठीची भूसंपादन प्रक्रिया महापालिकेने करून द्यावी, सर्व उड्डाणपूल बांधण्याची जबाबदारी राज्य सरकार घेईल, असा प्रस्ताव युती सरकार सत्तेत असताना तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी दिला होता. त्यावेळी पुणे महापालिकेत काँग्रेसची सत्ता होती.
उड्डाणपूल बांधले गेले तर त्याचे श्रेय भाजपला मिळेल या भीतीने काँग्रेसने हा प्रस्ताव फेटाळून लावला. काँग्रेसच्या सत्ता काळात जे उड्डाणपूल बांधले ते नियोजन शून्य होते. म्हणूनच विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडावा लागला. त्यामुळेही शहरात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.' असंही धीरज घाटे यांनी सांगितलं आहे.
'मेट्रो सेवा सुरु करावी असा प्रस्ताव मंजूर करणारी पुणे महानगरपालिका ही देशातील पहिली महापालिका होती. सन 2005 मध्ये हा प्रस्ताव मंजूर झाला. परंतु पुढच्या दहा वर्षांमध्ये अन्य महानगरांमध्ये मेट्रो सुरू झाली पुण्यात ती सुरू होऊ शकली नाही याला काँग्रेसचे उदासीन नेतृत्व जबाबदार होते.
सार्वजनिक वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा मेट्रो प्रकल्प भाजपने मान्यता देऊन सुरू केला. त्याचा पहिला टप्पा पूर्णही केला आणि दुसऱ्या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. काँग्रेसने वेळीच मेट्रोचे काम सुरू केले असते तर आज उद्भवलेली वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली नसती.
'सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्याचा उद्देशाने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने(Congress) कात्रज ते स्वारगेट या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर बीआरटी सुरू केली. परंतु घाईघाईने केलेल्या या प्रकल्पामध्ये अनेक त्रुटी राहिल्या. परिणामी बीआरटी प्रकल्प अपयशी ठरला. वाहतूक कोंडी होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे.
सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी सन 2012 ते 2017 काँग्रेसच्या सत्ता काळात महापालिकेत एकही नवीन बसची खरेदी करण्यात आली नाही. सन 2017 ते 22 या कालावधीत 1000 हून अधिक पर्यावरण पूरक बसेसची खरेदी भारतीय जनता पार्टीने केली.
भाजपने नेहमीच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे काँग्रेसने काल केलेले आंदोलन ही स्टंटबाजी असून चोराच्या उलट्या बोंबा आहेत.' टीका भाजपचे शहराधय्यक्ष घाटे यांनी केली आहे. काँग्रेस पक्षाने यासाठी पुणेकरांची माफी मागावी अशी मागणी घाटे यांनी केली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.