Bharat Vs INDIA Row  Sarkarnama
पुणे

Bharat Vs INDIA Row : 'भारत' जोडो' नावाने यात्रा काढता, मग त्या नावाने काळीज का धडधडतंय ? भाजपच्या वाघांनी काँग्रेसला डिवचलं

उत्तम कुटे

Pimpri : इंडिया आणि भारत अशा दोन्ही नावांनी संबोधल्या जाणाऱ्या आपल्या देशाचे नव्याने अधिकृत बारसं भारत असं केले जाणार असल्याच्या चर्चेने सध्या देशभर मोठा जोर धरलेला आहे. त्यावरून वादळ उठलेलं आहे. केंद्रातील एनडीए सरकारला हे नाव हवे असल्याने विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा त्याला विरोध आहे.

इंडियाचं 'भारत' असं अधिकृत बारसं होण्यापूर्वीच राष्ट्रपती भवनाने इंडियाऐवजी 'भारत' शब्द नुकताच वापरल्याने त्यावरूनही वादंग झालं आहे. कारण त्यांच्या निमंत्रणपत्रिकेत आतापर्यंत प्रेसिडेंट ऑफ इंडिया असा उल्लेख होत होता. तो आता प्रेसिंडेट ऑफ भारत असा करण्यात आला आहे. दुसरीकडे एनडीए आणि इंडिया आघाडीत या नामकरणापर्वीच जुंपली आहे. भाजपच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ यांनी नेहमीसारखा विरोधी आघाडीवर यानिमित्ताने पुन्हा हल्लाबोल केला.तर, भाजप तथा मोदींच्या या खेळीची ठाकरे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी खिल्ली उडवली आहे.

'भारत' जोडो नावाने यात्रा काढता,मग आता त्या नावाने काळीज का धडधडतंय,असं म्हणत इंडियाच्या भारत या संभाव्य नामकरणावरून भाजप नेत्या आणि महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी कॉंग्रेसला टोला लगावला आहे.

जगात भारत ही सगळ्यात प्राचीन संस्कृती असल्याचा दावा करीत हे नावच देशवासीयांची ओळख,अभिमान आणि गर्व आहे.त्याच नावाची पुन:स्थापना होते आहे, ही बाब भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे, असे म्हणत वाघ य़ांनीही एकप्रकारे हे नामकरण होणार असल्याला पुष्टी दिली आहे. तसेच विरोधी पक्षांनो, यात्राही 'भारत' जोडो नावानेच काढली होती ना ? मग तुमचं काळीज का धडधडतंय ? असा सवाल त्यांनी केला.त्यामुळे अभिमानाने म्हणा, मेरा भारत महान!असे आवाहन त्यांनी केले.

आदित्य ठाकरेंनी हिंदीतून ट्विट केलंय.त्यात त्यांनी भाजपला टोला मारताना दुसरीकडे इंडिया आघाडीतील सहकारी पक्षांचे अभिनंदन केले आहे. कारण त्यांच्या इंडिया आघाडीमुळे खेलो इंडिया, फिट इंडिया, मेक इन इंडिया, स्किल इंडियासारख्या घोषणांतच व्यस्त असलेल्या केंद्र सरकारला आपल्या देशाचे नाव इंडिया आणि भारतही आहे,याची जाणीव झाल्याचे ठाकरे यांनी उपरोधिकपणे म्हटले आहे. त्याचवेळी जी आपली जमीन चीनने बळकावली आहे,तो सुद्धा भारतच आहे, G 20च्या पडद्यामागे दडवलेत ते सुद्धा भारतीय आहेत,अशी सणसणीत चपराक त्यांनी केंद्र सरकारला लगावली आहे.

"जे काश्मिरी पंडीत आहेत, ते ही भारतीय आहेत आणि मणिपूर मध्ये ज्या महिलांवर अत्याचार झाले त्या सुद्धा भारतीयच आहेत,असा दुसरा टोला त्यांनी मारला आहे.आमची लढाई ही भारत-इंडियाच्या लोकशाहीची, देशाच्या संविधानाची,एकता, शांती आणि प्रगती आणि अखंडतेसाठी आहे,असे सांगत मी भारतीय आणि इंडियन असल्याचा गर्व आहे,असे त्यांनी शेवटी म्हटले आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT