Dilip Walse Patil
Dilip Walse Patil  Sarkarnama
पुणे

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात केवळ दहा जागा मिळतील : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचे भाकीत

नितीन बारवकर

शिरूर (जि. पुणे) : महाविकास आघाडी एकत्र लढली तर लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला केवळ दहा जागा मिळतील, असे सध्याचे चित्र आहे. देशस्तरावरील भाजपविरोधी राजकीय मूड कर्नाटकातील निवडणुकीतून दिसून आला आहे, असे सांगत हा राजकीय मूड कायम राहिला तर देशात सत्ताबदल होऊ शकतो, असे सर्व्हे सांगत आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला. (BJP will get only 10 seats in Maharashtra in Lok Sabha elections: Dilip walse Patil)

आंबेगाव विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या शिरूर तालुक्यातील ४२ गावांतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिरूर तालुक्यातील मलठण येथे झालेल्या मेळाव्यात वळसे पाटील (Dilip Walse Patil) बोलत होते. येत्या दहा जूनला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा (NCP) वर्धापनदिन आहे. त्यानिमित्त नगर येथे होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनाची पूर्वतयारी व तालुकास्तरावरील नियोजनासाठी आयोजित मेळाव्यात वळसे पाटील यांनी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

वळसे पाटील म्हणाले की, देशातील निम्मी राज्ये भाजपच्या (BJP) ताब्यात नाहीत. महाराष्ट्रात केवळ दहा जागा मिळतील, असा अंदाज आहे. देशातील सर्वच विरोधी पक्ष एकवटल्याने देशातही सत्ताबदल होऊ शकतो. अशावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तळागाळातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली असून, जनमत विचलित होणार नाही याची खबरदारी आगामी काळात घ्यावी लागेल.

आगामी निवडणूका महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एकत्र येऊन लढविल्यास भाजपची डाळ शिजणार नाही. महाराष्ट्र ताब्यात असल्याशिवाय देशाची सत्ता मिळविणे कठिण आहे, हे ओळखलेल्या भाजप नेतृत्वाने महाराष्ट्रात जो राजकीय खेळ उभा केला, त्याच्यामुळे राज्याच्या झालेल्या तोट्याची, मानहानीची माहिती सामान्य लोकांना, तळागाळातील जनतेला समजून सांगितली पाहिजे. त्याचवेळी राज्यातील सत्ता पुन्हा मिळविण्याची खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

विखे पाटलांचा तो डाव हाणून पाडा

कुकडी प्रकल्पांतर्गत डिंभे धरणातील अतिरिक्त पाणी बोगद्याद्वारे दुष्काळी भागाला देण्यास विरोध नाही. तथापि, या बोगद्याची खोली पाहता धरणाच्या तळातील पाणीही पळविण्याचे षडयंत्र असल्याचे स्पष्ट दिसते. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सांगण्यावरूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेऊ पाहात असलेला हा निर्णय हाणून पाडण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी पक्षभेद विसरून संघटीत होण्याची, या निर्णयाविरोधात लढा देण्याची गरज आहे. आत्ताच जागे झालो नाही, तर भविष्यात आपल्या शेतीचे वाळवंट होईल, असा धोका माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.

पक्षाची ताकद वाढवा : पाचुंदकर

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जनकल्याणकारी ध्येयधोरणांमुळे व नेत्यांच्या दुरदृष्टीमुळे या परिसराचा विकास झाला असून दुष्काळाचे चित्र हटले आहे. भागाचा कायापालट झाला आहे. या बदलातून उतराई होताना पक्षाचे बळ वाढविणे ही पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबरच शेतकरी, कामगार, मजूर व इतर घटकांची जबाबदारी आहे. देशपातळीवर पक्षाची ताकद दाखवून देण्यासाठी नगर येथे होणाऱ्या अधिवेशनात सर्वांनी उपस्थित राहावे, असे आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी सांगितले.

माजी आमदार पोपटराव गावडे व सूर्यकांत पलांडे, भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक ॲड. स्वप्नील ढमढेरे, रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक सुहास थोरात व सोपानराव भाकरे, माजी संचालक राजेंद्र गावडे यांची या वेळी भाषणे झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT