Chandrakant Patil Sarkarnama
पुणे

Chandrakant Patil : पुण्यातील आठही मतदारसंघातील 'या' त्रुटीकडे चंद्रकांतदादांचं लक्ष...

Sudesh Mitkar

Pune Political News : लोकसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये गंभीर त्रुटी होत्या. त्यामुळे पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिले‌.

त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या मतदार याद्यांतील दोष दूर कराव्यात, अशी मागणी भाजप पुणे शहरच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे केली. तसेच, मतदार प्रारुप याद्याही लवकर प्रसिद्ध कराव्यात असा आग्रहही यावेळी करण्यात आला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीतील सदोष मतदार याद्यांसंदर्भात भाजपा शिष्टमंडळाची पुणे जिल्हा निवडणूक प्रमुख तथा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली. या बैठकीत शिष्टमंडळाने मतदार याद्यांमधील त्रुटींकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, योगेश टिळेकर, भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीलाच चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी लोकसभा निवडणुकीत कोथरूड विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमधून 46 हजार 900 नावे वगळण्यात आली. त्यासोबतच नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण एक लाखापेक्षा जास्त मतदारांची नावे याद्यांमधून वगळल्याचे सांगितले.

यामुळे मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागल्याचे पाटील यांनी जिल्हाधिकारी दिवसे यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे जनजागृतीच्या अभावामुळे 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही मतदान करता आले नसल्याचा दावा पाटील यांनी केला.

माधुरी मिसाळ Madhuri Misal यांनी मतदान केंद्रांवर संथ गतीने मतदान प्रक्रिया राबविण्यात आल्याने मतदारांना अनेक ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागल्याची बाब मांडली. तर, योगेश टिळेकर यांनी मतदारांना मतदान केंद्रांची माहिती वेळेत न मिळाल्याने अनेकांना मतदानापासून वंचित रहावे लागल्याचे सांगितले. याशिवाय सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर यांनीही मतदार याद्यांमधील त्रुटी आणि मतदान केंद्रांवरील अडचणींकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले‌.

या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, जेणेकरून आगामी विधानसभा निवडणूक चांगली होईल व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल, अशी यावेळी शिष्टमंडळाने अपेक्षा व्यक्त केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, 2 ऑगस्ट रोजी मतदार प्रारुप याद्या जाहीर करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर ज्यांची नावे वगळली गेली आहेत त्यावर हरकती आणि सूचना मागविण्यात येणार असल्याचे शिष्टमंडळाला आश्वास्त केले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT