Chandrashekhar Bawankule on Lovestory : Sarkarnama
पुणे

Chandrashekhar Bawankule News: दीडशे एकराचे मालक असूनही बावनकुळेंना रिक्षा का चालवावी लागली?

सरकारनामा ब्यूरो

Pune News : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य करतानाच आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत व आपल्या विवाहाच्या गोष्टीबाबत पहिल्यांदाच खुलासा केला आहे. बावनकुळे यांची 'सरकारनामा'च्या वतीने विशेष मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत आपल्या प्रेमविवाहबाबत भाष्य करताना, लग्नानंतर आपल्याला काही काळ घर सोडावं लागलं होतं, याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.

रिक्षा चालवणारा एक कार्यकर्ता ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष या मधल्या काळाकडे तुम्ही कसे पाहता? या प्रश्नावर उत्तर देताना बावनकुळे यांनी प्रेमविवाह केल्यानंतर आपल्याला कसे जीवनात संघर्ष करावा लागला. घरची परिस्थिती अत्यंत चांगली असताना, कुटुंबात १५० एकर जमीन असतानाही आपल्याला रिक्षा चालवावी लागली, दूध विकावं लागलं अशी आठवण त्यांनी सांगितली.

बावनकुळे म्हणाले, "मला लग्नानंतर रिक्षा चालवावी लागली. आमच्या घराची पार्श्वभूमी ही मालगुजर, आमच्या कुटुंबाकडे १५० एकर जमीन होती. आमचे आजोबा इंग्रजांच्या काळातले पोलीस पाटील. पण जेव्हा मी लग्नाचा निर्णय घेतला होता, तेव्हा मी घरच्यांचं ऐकलं नाही. म्हणून मला काही काळ घराबाहेर राहावं लागलं, अशी भावूक आठवण बावनकुळेंनी सांगितली.

बावनकुळे पुढे म्हणाले, "मी ओबीसी समाजातून आहे, माझी पत्नी मराठा कुणबी समाजातून येतात. माझ्या या लग्नाच्या निर्णयामुळे घरात वाद झाले. त्यामुळे मला घराच्या बाहेर राहावं लागलं. कारण मी माझ्या मनाने निर्णय घेऊन लग्न केलं होतं. मग या कठीण परिस्थितीत कसा निभाव लागणार? काय खायचं? यामुळे मला त्यावेळी रिक्षा चालवावी लागली, दूध विकावं लागलं. मग काही काळानंतर घरच्यांनी आम्हा दोघांना स्वीकारलं, पुन्हा आम्ही घरात गेलो. माणसाच्या आयुष्यात काही काळ हा वाईट असतो, जगण्यासाठी सुद्धा लढा द्यावा लागतो. त्यावेळी मला काय मार्ग होता, त्यामुळे मला रिक्षा चालवावी लागली."

तिकीट कापल्यानंतर काय भावना होती?

2019 च्या विधानसभेला मला तिकीट नाकारण्यात आलं, पण ठिकंय. तिकीट नाकारलं तरी पक्षासाठी तेवढंच काम करावं लागलं. पक्ष जेव्हा तिकीट नाकारतो किंवा तुम्हाला थांबावं लागतं, तेव्हा तुम्ही कसे व्यक्त होता, हे ही महत्वाचं आहे. पक्षाने तिकीट नाकारलं तरी माझ्या मतदारसंघात माझ्या पक्षाचा आमदार निवडून यावा, अशी भावना असली पाहिजे. मी ३२ विधानसभा मतदारंसंघात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत काम केलं. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्यासोबत पक्षासाठी काम केलं. मी कधीच कुठलीही नाराजी व्यक्त केली नाही, असे बावनकुळे म्हणाले.

"तिकीट कापल्यानंतर काही काळासाठी वाटलं की, राजकीय प्रवासात थोडं वरच्या स्तरावर गेल्यानंतर आपण थांबलो आहोत. पण मला देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्या नेतृत्वावर विश्वास होता. मला आमच्या राष्ट्रीय नेतृत्वांवर विश्वास होता. राष्ट्रीय नेतृत्व मला काही ना काही जबाबदार देईल, याचा मला विश्वास होता. मला आमदार व्हायची महत्त्वाकांक्षा नव्हती, मी यापूर्वीच चार वेळा आमदार होतो, राज्याचा मंत्रीही होतो. याच्या पेक्षा जास्त काय होणार होतं? याच्यापेक्षा अधिक मला काय काही व्हायची इच्छा नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

(Edited By -Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT