Chitra Wagh - Supriya Sule  Sarkarnama
पुणे

Chitra Wagh On Supriya Sule : 'तोंडाने म्हणायचे रामकृष्ण हरी आणि चतुर्थीला खायची मटणकरी' चित्रा वाघांची सुळेंवर टीका !

Chaitanya Machale

Baramati News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील रंगत वाढत असून मतदानासाठी अवघे काही दिवस राहिल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांची धावपळ सुरू आहे. राज्यातील महत्वाच्या आणि प्रमुख लढती असलेल्या मतदारसंघात नेत्यांचे दौरे वाढले आहेत. सर्वांचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातही महायुतीत सहभागी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जोरदार हजेरी लावून प्रचार करण्यास सुरूवात केली आहे. भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी गुरूवारी बारामतीत प्रचार दौरा केला.

बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीने विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. सुळे यांच्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) बारामतीमध्ये ठाण मांडून बसले आहेत. तर सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजितदादांनी जोरदार ताकद लावली आहे.

बारामतीमध्ये प्रचारासाठी आलेल्या चित्रा वाघ यांनी खासदार सुळे यांच्यावर टीकास्त्र सोडले. सुळे यांची सध्याची परिस्थिती पाहून मला खूप हसायला येते. गाडीत बसून एखाद्याचा रील काढून घ्यायचा, तो लगेच व्हायरल करायचा, हेच त्यांचे काम आहे.'तोंडाने म्हणायचे रामकृष्ण हरी आणि चतुर्थीला खायची मटनकरी' अशा शब्दात वाघ यांनी सुळेंवर टीका केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात, केंद्रात सत्तेत असतात त्यावेळी त्या सगळं विसरून जातात. मात्र विरोधक आल्यावर त्यांना सगळं आठवतं, असे वाघ म्हणाल्या. मोठ्या ताई किती बोलणार ? अडीच वर्षे त्या सत्तेत होत्या, त्यावेळी त्यांनी काय केलं? बारामती लोकसभेत यंदा बदल होईल. या निवडणुकीत पवारांची सुनबाई ही दिल्लीला नक्की जाईल, असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला. राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात आपण फिरत असून त्याचाच एक भाग म्हणून बारामतीमध्ये आले आहे. यावेळी वाघ यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करत आमदार रोहित पवार यांना आव्हान देखील दिले.

वाघ म्हणाल्या, आमदार रोहित पवारांना (Rohit Pawar) माझे आव्हान आहे, त्यांनी महाराष्ट्रातील एक माणूस मला दाखवावा ज्यांना मोदींच्या योजनेचा लाभ मिळालेला नाही. मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण योजना राबविल्या असून त्याचा फायदा जनतेला झाल्यानेच नागरिक मोदी सरकारच्या बाजुने उभे राहत असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने दिलेलं इंजेक्शन घेतलं नसतं तर आमच्यावर टीका करायला देखील हे शिल्लक राहिले नसते,अशी टीकाही त्यांनी केली आहे. जे पेरले गेलं ते समोर उगवले आहे, जे पेरले त्याचे रिटर्न्स त्यांना मिळालेले आहेत, अशा शब्दात जयंत पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेला वाघ यांनी उत्तर दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT