Harshvardhan Patil-Dattatray Bharane
Harshvardhan Patil-Dattatray Bharane Sarkarnama
पुणे

भाजपचा 'तो' दावा राष्ट्रवादीने काही तासांतच खोडला : ‘भरणेंच्या कामाचे श्रेय हर्षवर्धन पाटलांनी घेऊ नये’

संतोष आटोळे

इंदापूर (जि. पुणे) : इंदापूर (Indapur) तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या मंजुरीवरून राजकारण सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. (Credit dispute of water supply schemes in Indapur taluka)

इंदापूर तालुक्यातील सात गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनांना केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या प्रयत्नामुळे विद्यमान राज्य सरकारने मंजुरी दिल्याचा दावा भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार यांनी केला. त्यानंतर काही तासांच्या आतच पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्रीसारखी राजकीय कारकीर्द असणाऱ्या शरद जामदारांनी लहान तोंडी मोठा घास घेऊ नये. आमदार दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांनी केलेल्या विकास कामांचे श्रेय हर्षवर्धन पाटलांनी घेऊ नये, असा टोला राष्ट्रवादाचे नेते सचिन सपकळ यांनी केला. यामुळे आगामी काळात इंदापूरचे राजकारण तापणार असल्याचे दिसत आहे.

इंदापूर तालुक्यातील वडापुरी (रु.13.55 कोटी), वालचंदनगर (46.45 कोटी), सणसर (54.54 कोटी), उद्धट (102.65 कोटी), शेळगाव (49.30 कोटी), भरणेवाडी (16.32 कोटी), कळस (27. 97 कोटी) मंजूर झाले आहेत. ही कामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून हर घर हर जल या कार्यक्रमांतर्गत होणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे तालुक्यातील जनतेच्या वतीने भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड. जामदार यांनी आभार व्यक्त करणारे प्रसिद्धी पत्रक काढले आहे. त्यास अवघ्या काही तासांतच राष्ट्रवादी काँग्रेसकडून सपकळ यांनी प्रत्युत्तर दिले

जल जीवन मिशन योजनेचा प्रारुप आराखडा हा 12 मार्च 2021 रोजी तत्कालीन पालकमंत्री तथा जलजीवन योजनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन राज्यमंत्री भरणे सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्याचा प्रारूप आराखडा मंजूर झाला आहे. या योजनेचा सुरुवातीचा आराखडा मार्च 2021 ला 250 कोटी मंजूर झाला होता, त्यानंतर जून 2022 मध्ये डीएसआर रेटमध्ये बदल झाल्यानंतर हाच आराखडा 454 कोटींचा झाला, तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे असणाऱ्या 26 गावांचे अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर संपूर्ण तालुक्याचा 600 कोटींपेक्षा जास्त आराखडा झाला, हे केवळ माजी राज्यमंत्री भरणे यांच्या प्रयत्नाने झाला आहे, असा दावा सचिन सपकळ यांनी केला.

तालुक्यातील जनतेने 2014 पासून ज्यांना सक्तीची विश्रांती दिली, त्यांनी या सहा महिन्यांत अवकाळी सरकार आल्यापासून नको त्या कामाचे श्रेय घेण्याचे ठरवले आहे. परंतु वीस वर्ष मंत्री राहून जर दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेत असाल तर ते आपल्या नैतिकतेला धरून आहे का? असा सवालही सपकळ यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT