Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar : 'मुख्यमंत्री-मुख्यमंत्री करु नका, जरा...'; भर कार्यक्रमात अजितदादांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले

Ganesh Thombare

Pune News: केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांनी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्ष संघटना बांधणीसाठी सभा, मेळावे घेण्याचा धडाका लावला आहे.

रविवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा 'युवा मिशन 2024' मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजित पवारांनी राष्ट्रवादीतील फूट ते आपण युतीमध्ये बरोबर जाण्याचा निर्णय का घेतला ? अशा अनेक विषयांवर भाष्य करत मुख्यमंत्री-मुख्यमंत्री म्हणून घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांचे भर कार्यक्रमात अजितदादांनी कान टोचले. (Ajit Pawar Pune NCP Melava )

या मेळाव्यात युवकांना मार्गदर्शन करताना आपल्याला विकासावर लक्ष द्यायचं असून आज परिस्थिती बदलत आहे. त्यामुळे आपल्याला हा बदल स्वीकारायला हवा. आपल्याला विकासावर लक्ष द्यायचं आहे. पक्ष संघटना बांधणीसाठी चांगल्या प्रकारे काम करायचं आहे. राष्ट्रवादीचं नवं युवा धोरण लवकरच देणार आहे. समाजकारणात आणि राजकारणात काम करत असताना आपल्याकडून अपशब्द जाता कामा नये, तरुणांनी राजकारणात येताना जबाबदारीने वागावं, असा सल्ला अजित पवारांनी युवकांना दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वेगळी भूमिका का घेतली ?

"आपण ही भूमिका का स्वीकारली, तर आपल्या बहुजन समाजातील प्रत्येक व्यक्तीला न्याय देता आला पाहिजे. काम करता आलं पाहिजे, आपण भाजपबरोबर का गेलो, हे अनेकवेळा सांगितलं आहे. आपण भाजपबरोबर गेलो असलो तरी आपली विचारधारा ही सेक्युलरच आहे. पण एकाच धोरणावर अवलंबून राहायचं नसतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेवढे आमदार निवडून आले त्यांच्यापैकी अनेकांची ही भावना होती. पण त्यांची भावना वरिष्ठ ऐकूण घेत नव्हते. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. आपल्या पक्षाची इतर पक्षामागे फरफटत होऊ नये, म्हणून आपण ही नवी भूमिका स्वीकारली. यातून कोणाचा अवमान करण्याचा हेतू नाही. समाजातील सर्वांना न्याय देता आला पाहिजे एवढंच", असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

'मुख्यमंत्री-मुख्यमंत्री करु नका...'

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी युतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यासंदर्भात अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनी देखील विधानं केली होती.

आता अजित पवारांनी आजच्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांचे कान टोचले आहेत. मुख्यमंत्री-मुख्यमंत्री घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी सल्ला देत जरा कळ सोसा. फक्त मुख्यमंत्री-मुख्यमंत्री करु नका. आधी पक्षसंघटना मजबूत कशी करता येईल, याकडे लक्ष द्या, असा सल्ला त्यांनी दिला.

'मोदींना पर्याय नाही...'

"आज जगामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही. 24 तासातील 18 -18 तास पंतप्रधान मोदी काम करतात. देशात अनेक महामार्गाचे काम त्यांच्या माध्यमातून निर्माण झाले. याबरोबरच पाण्याचे प्रश्न, 80 कोटी जनतेला अन्न धान्य वाटपाची योजना, अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील त्या त्यांनी केल्या आहेत. हे आपल्याला नाकारता येणार नाही. आता मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे", असं अजित पवारांनी म्हटलं.

(Edited By-Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT