<div class="paragraphs"><p>Narayan Rane, Ajit Pawar&nbsp;</p></div>

Narayan Rane, Ajit Pawar 

 

Sarkarnama 

पुणे

पराभवानंतर अजितदादांचं राणेंना आवाहन; म्हणाले, मिळून कोकणचा कायापालट करू!

मिलिंद संगई

बारामती : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या (Sindhudurg District Bank Election) निवडणुकीत भाजपने (BJP) बाजी मारत महाविकास आघाडीचा (MahaVikas Aghadi) पराभव केला आहे. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण राणेंनी तिन्ही पक्षांना धूळ चारत पुन्हा आपला करिष्मा दाखवून दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या निवडणुकीत प्रचार करत राणेंवर टीकास्त्र सोडलं होतं. आता पराभवानंतर बोलताना पवारांनी राणेंना मिळून कोकणचा कायपालट करू, असं आवाहन केलं आहे.

बारामती (Baramati) येथे माध्यमांशी बोलताना पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC) निवडणुकीसाठी बारामतीत पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पवार म्हणाले, सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणुकीत दुर्देवाने महाविकास आघाडीला अपयश आले. ज्यांना यश मिळाले त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी ही बँक चांगली चालवावी अशा शुभेच्छा देतो, अशा शब्दात अजित पवार यांनी पराभव स्वीकारत राणेंच्या पॅनेलच्या विजयाबद्दल प्रतिक्रिया दिली. तसेच राणेंनाही प्रत्युत्तर दिलं.

अर्थमंत्री येऊनही बँकेच्या निवडणूकीत फरक पडला नाही, अशी टीका राणे यांनी केली होती. त्यावर बोलताना पवार म्हणाले, नारायण राणे हे केंद्रात मंत्री आहेत. त्यांनी एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा केंद्रातून निधी आणावा. आम्ही राज्याच्या माध्यमातून कोकणसाठी निधी उपलब्ध करुन देऊ, सर्वांनी मिळून कोकणचा कायापालट करु, असे पवार म्हणाले.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सज्ज

कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, दुसरी लाट कमी झाली तेव्हापासूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण आढावा घेत होतो. तिसरी लाट येईल, असे गृहित धरुन व्हेंटिलेटर, ऑक्सिजन व साधे असे तिन्ही बेड्स वाढविण्यासह ऑक्सिजनचा पुरवठा तिप्पट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व आरोग्य विभागास दिले होते. त्यानुसार दुस-या लाटेत सर्वाधिक ऑक्सिजन जितका लागला त्याच्या तिप्पट व्यवस्था करण्यात आली आहे. लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करण्यासाठी आता प्रत्येक घरात जाऊन तपासणी करण्याचे सुचनाही दिल्याचे पवार यांनी सागंतिले.

आरक्षणाशिवाय निवडणुका नकोच

ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) प्रश्न संपल्याशिवाय निवडणूका घेऊ नये यावर सर्वच राजकीय पक्षांचे एकमत असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केलं. अलाहाबाद उच्च न्यायालयाने तेथील सरकारला निवडणुका पुढे ढकलण्याबाबत सुचविले आहे. कोरोना रुग्णांचीही संख्या वेगाने वाढत आहे. त्याचे गांभीर्यही सर्वांनीच लक्षात घ्यावे. प्रत्येक घटकाला त्यांचा अधिकार मिळाल्याशिवाय कोणतीही निवडणूक होऊ नये, यासाठी प्रसंगी न्यायालयात जाण्याचाही विचार करत असल्याचे पवार यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT