Dilip Walse Patil
Dilip Walse Patil sarkarnama
पुणे

'भोंगे बंद केल्यास भजन, कीर्तन, काकडारती यांचे काय करायचे?'

रवींद्र पाटे

नारायणगाव : भोंगे लावले अथवा काढले तर बेरोजगारी, महागाई हे सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? भोंग्याच्या आडून राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात अशांतता निर्माण करून हे सरकार कसे जाईल, यासाठी विरोधकांचे कारस्थान सुरु असल्याची टीका राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी केली.

खोडद (ता. जुन्नर) येथील श्री आंबिका पतसंस्थेच्या श्री आंबिका सहकार भवन या नूतन इमारतीचे उदघाटन वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अतुल बेनके (Atul Benke) होते. या वेळी बाजार समितीचे सभापती संजय काळे, सभापती देवदत्त निकम, गुलाबराव नेहेरकर, विनायक तांबे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, सरपंच मनीषा गुळवे, पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष गायकवाड, उपाध्यक्ष सुरेश खरमाळे, सचिव शिवाजी खरमाळे, संचालक शैलेश गायकवाड, संतोष पटाडे, रोहिदास गायकवाड, बजरंग खरमाळे, विठ्ठल पानमंद, सर्जेराव कुचिक, प्रकाश गायकवाड, संदीप गुळवे, सीमा थोरात, संगीता गायकवाड, विद्या गायकवाड, दिलीप गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र गायकर आदी उपस्थित होते.

वळसे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार राज्याला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना संकटाचा सामना राज्य शासनाने सक्षमपणे केला. पण दुर्दैवाने विरोधक वाढलेली महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी, देशात काँग्रेसने उभारलेले महत्वाचे प्रकल्प विक्री करण्याचे केंद्र शासनाने धोरण, देशाचे विकासाचे धोरण या बाबत न बोलता राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात राजकारण केले जात आहे. भोंगा महत्वाचा नाही मात्र भोंग्यावरुन हिंदु- मुस्लिम यांच्यामध्ये राज्यात वाद वाढण्याचा प्रयत्न सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत भोंगा वाजवण्यास निर्बंध आहेत.

त्या नुसार कार्यवाही झाल्यास प्रवचन, कीर्तन, काकड आरती, जागरण गोंधळ आदी देवाचे कार्यक्रमांचे काय असा प्रश्न आहे. केंद्र सरकारच्या सहकार धोरणावर टीका करताना वळसे पाटील म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण, शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यात सहकार चळवळ उभी केली. या माध्यमातून दूध संस्था, विकास सोसायट्या, अर्बन बँक, साखर कारखाने, पतसंस्था, बाजार समित्या निर्माण झाल्या. या मुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन झाले. निर्बंध लादून सहकार चळवळ अडचणीत आणण्याचे धोरण केंद्र सरकारचे आहे. श्री अंबिका पतसंस्थेने सचोटी व प्रामाणिक पणाने काम केल्याने १९९१ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने प्रगती केली. संस्थेच्या ९ शाखा कार्यरत असून १२५ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत, असेही त्यांनी सांगितले.

या वेळी आमदार बेनके म्हणाले, तालुक्यातील टॉप टेन पतसंस्थेत श्री अंबिका पतसंस्थेचा समावेश आहे. येथील श्री जगदंबा माता देवस्थानला तीर्थक्षेत्र दर्जा देण्यासाठी व ग्रामस्थांनी मागणी केलेल्या रस्ते, पूल, बंधारा दुरुस्ती आदी विकास कामांसाठी निधी दिला जाणार आहे. पतसंस्थेचे अध्यक्ष गायकवाड म्हणाले पतसंस्थेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, फळझाडांच्या रोपांचे वाटप आदी समाजउपयोगी उपक्रम राबविले जातात. सूत्रसंचालन जालिंदर डोंगरे यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT