NCP Pune
NCP Pune Sarkarnama
पुणे

पुण्याला पालकमंत्री देता का..? राष्ट्रवादीचे आंदोलन

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राज्यात सरकार (State Government) स्थापन होऊन महिना होत आला तरी दोनच मंत्री काम करत आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही हा महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेचा अपमान आहे. सरकारने तातडीने अधिवेशन बोलावून मंत्रिमंडळ व सर्व पालकमंत्र्यांची नियुक्ती करावी.अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने (Nationlist Congress Party) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

पुणे शहर व जिल्हा राज्याचे प्रमुख शैक्षणिक,औद्योगिक व राजकीय केंद्र असून पुण्याचा कारभार गेल्या एक महिन्यापासून पालकमंत्र्यांशिवाय सुरू आहे. राज्यात सध्या अतिवृष्टीचे संकट ओढावले असून या आपत्कालीन परिस्थितीत जर मंत्रीच नसतील तर या खात्यांचा कारभार कोणाच्या भरवश्यावर सुरू आहे, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात विचारण्यात आला.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले,‘‘ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेच काम करत असल्यामुळे अनेक बाबींकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. मागच्या एका महिन्यात राज्यातील विविध भागांमध्ये तब्बल ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच कुठले राज्य सरकार स्थापन झाल्या नंतर एका महिन्यात इतक्या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही बाब महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आहे.’’

"राज्यातील या सर्व आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने अधिवेशन बोलवावे व ओला दुष्काळ जाहीर करत या ८९ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरीव मदत द्यावी",अशी मागणी यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली.

महाविकास आघाडी सरकार असताना १८ जुलै रोजी पावसाळी अधिवेशन घेण्याचे ठरविले होते. मात्र सत्ताबदल झाल्यानंतर २५ जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली होती. आता २५ जुलै होऊनही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तारच झालेला नाही. सरकारकडे बहुमत आहे तर अधिवेशन घ्यायला सरकारला भीती का वाटत आहे? असा सवाल जगताप यांनी उपस्थित केला.

राज्यात नवे सरकार आल्यानंतर जुन्या सरकारच्या योजनांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला जातोय. वास्तविक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्या सरकारच्या काळात महाविकास आघाडी सोबत काम केले आहे. तरीही त्यांनी जुनी कामे स्थगित करण्याचा दणका लावला आहे. कोणतेही सरकार हे कायम नसते, हे दोन्ही नेत्यांनी समजून घ्यायला हवे. मविआ सरकारने पुण्यातील वढू येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी २६५ कोटींचा आराखडा केला होता, त्याचा निधी थांबविण्यात आल्याचा आरोप शहराध्यक्ष जगताप यांनी केला.

आंदोलनात आजरामर नटसम्राट नाटकातील गणपतराव बेलवलकरांची आठवण करत शहर प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी पालकमंत्रीपदावरून नटसम्राटमधील संवाद सादर केला. ते म्हणाले, ‘‘ हे विघात्या तु ईतका कठोर का झालास. हे करूना करा आम्ही पुणेकरांनी कोणाच्या कडे कामे घेऊन जायचे. पुण्याला, खड्ड्यांची चाळण झालेल्या ह्या शहराला. ट्रॅफिक जाममध्ये अडकलेल्या ह्या शहराला. अनेक अडचणी असणाऱ्या ह्या शहराला. कोणी पालकमंत्री देता का पालकमंत्री’’ हा संवाद सादर करत सद्यस्थिती विषद विषद करून सरकारच्या नाकर्तेपणावर ओरखडे ओढले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT