Dhananjay Munde
Dhananjay Munde Sarkarnama
पुणे

नरेंद्र मोदींनाही शेतकऱ्यांपुढे झुकावे लागले : धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

पराग जगताप

ओतूर (जि. पुणे) : भाजप (BJP) सरकार हे शेतकरीविरोधी असून शेतकऱ्यांना नष्ट करण्याचे धोरण ते राबवित आहेत. कांद्याला अत्यल्प बाजारभाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकरी सुखी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने उभे राहिले पाहिजे. शेतकरी एकजूट व आंदोलनामुळे शेतकरीविरोधी कायदे केंद्र सरकारला मागे घ्यावे लागले. शेवटी नरेंद्र मोदींनाही (Narendra Modi) शेतकऱ्यांपुढे झुकावे लागले, एवढी ताकद शेतकरी एकजुटीत आहे, असे राज्याचे माजी सामाजिक व न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सांगितले. (Even Narendra Modi had to bow down to farmers : Dhananjay Munde's attack)

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी संघटना यांच्या वतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मोर्चानंतर झालेल्या सभेत धनंजय मुंडे बोलत होते. या वेळी ओतूर शहरातून शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. मुंडे यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत रॅलीत सहभाग घेतला. रॅलीत आमदार अतुल बेनके, विघ्नहर कारखानाचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, बाजार समितीचे माजी सभापती ॲड.संजय काळे, शेतकरी नेते तान्हाजी बेनके, अंबादास हांडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक घोलप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंडे म्हणाले की, शेतीला लागणारी खते, औषधाच्या किंमती वाढल्या, मजुरी वाढली त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादनाचा खर्च तिप्पट झाला आहे. बाजारभाव मात्र निच्चांकी आहे. परंतु सरकारला याबाबत काही पडले नाही. सत्तांतर नाट्य झाले. मंत्रीमंडळ स्थापन झाले, पालकमंत्र्यांच्या निवडी होतील. पण, शेतकरी व जनतेच्या समस्या सोडविणार कधी असा सवालही त्यांनी केला.

अतुल बेनके म्हणाले की, कांदा दरवाढीबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासमवेत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांची भेट घेतली. त्यांनी राज्य सरकारने याबाबत कोणताही प्रस्ताव पाठवला नसल्याचे सांगितले. राज्य सरकारने कांदाप्रश्नी निर्यातीवरील कर कमी करण्यासाठी प्रस्ताव पाठवायला हवा. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार व धनंजय मुंडे यांना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.

ठाकरे सरकारच्या काळात असा प्रस्ताव दिल्याने मागील वर्षी कांदा निर्यातीवरील कर कमी करण्यात आला होता. परंतु नवीन सरकारचे मंत्री जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन सत्कार समारंभात रमले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी विमा योजना सुरू करून शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित करावे, अशी मागणी केली, असता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. संजय काळे यांनी आगामी काळात ती राबवण्याचे मान्य केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT