MPSC Students Protest and Devendra Fadnavis
MPSC Students Protest and Devendra Fadnavis  Sarkarnama
पुणे

MPSC Students Protest : 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन; फडणवीसांनी दिलं 'हे' आश्वासन

सरकारनामा ब्यूरो

ज्ञानेश्वर हिंगोलीकर :

Pune News : राज्यसेवा परीक्षेतील बदल 2025 पासून लागू करण्याच्या मागणीसाठी 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांनी पुण्यात सोमवारपासून (दि.20 फेब्रुवारी) आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामध्ये तब्बल 1000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.

रात्रभर कडाक्याच्या थंडीतही हे सारे विद्यार्थी आंदोलन स्थळी बसून होते. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला युवक काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह सोमवारी अनेक नेत्यांनी भेट दिली.

या आधीही 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांनी पुण्यामध्येच राज्यसेवा परीक्षेतील बदल 2025 पासून लागू करण्याच्या मागणीसाठीच आंदोलन केले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना अश्वासन देत हा निर्णय मागे घेण्यात येईल.

या निर्णयाची अंमलबजावणी ही 2025 पासून केली जाईल, तसेच दोन दिवसात या निर्णयाचा जीआर निघेल, असे सांगितले होते. मात्र, अद्यापही याबाबत निर्णय झाला नसल्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत.

यामुळे आता 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांनी पुण्यात पुन्हा आंदोलन सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ''राज्य सरकारने अत्यंत तत्परतेने निर्णय करून आयोगाला कळवले होते.

2025 पासून हा अभ्यासक्रम लागू करा. मात्र, 'एमपीएससी'ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे राज्य सरकार त्यांना काही निर्देश देऊ शकत नाही. मात्र, 'एमपीएससी'ने राज्य सरकारला पुन्हा कळवलं आहे'', असं ते म्हणाले.

''यावर त्यांनी सांगितलं की प्रस्ताव आम्ही फुलकोरम समोर ठेवला. त्यावर त्यांनी सांगितलं हा निर्णय लागू केला पाहिजे. यावर पुन्हा मुख्यमंत्री म्हणाले विद्यार्थ्यांमध्ये निराशा निर्माण होत आहे, आपण थोडा वेळ दिला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा त्यांना पत्र पाठवलं असून त्या निर्णयाला री कन्सिडर करायला सांगितले आहे. त्यामुळे आयोग निर्णय री कन्सिडर करेल'', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

''जर तसं झालं नाही तर न्यायालयात जाऊ, पण विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहू. मात्र, माझी विनंती आहे की यात कोणीही राजकारण आणू नये, राज्य सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका घेतलेली आहे'', असंही यावेळी फडणवीस म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षेत बदल करण्याचे जाहीर केले आहे. तसेच हे बदल 2023 पासून लागू होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. मात्र 2023 ऐवजी 2025 पासून हे बदल लागू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्यामुळे आता यावर राज्य सरकार आणि एमपीएससी आयोग काय निर्णय घेतं? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT