Nitin Gadkari
Nitin Gadkari Sarkarnama
पुणे

संघाच्या कार्यकर्त्याने साखर कारखाना चालवला, याचे मोठे समाधान : गडकरी

रमेश वत्रे

केडगाव (जि. पुणे) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संस्कार ही आमच्या जीवनातील पुंजी आहे. भारताला महासत्ता बनविण्याचे संघाचे स्वप्न आहे. संघाच्या मुशीत तयार झालेल्या कार्यकर्त्यांनी (पांडुरंग राऊत व सहकारी) उत्तमरित्या साखर कारखाना चालवला, याचे मोठे समाधान आहे, अशा शब्दांत श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना उत्कृष्टपणे चालवल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पांडुरंग राऊत (Nitin Gadkari) यांच्याबद्दल गौरवोद्‌गार काढले. (Great satisfaction of RSS worker running sugar factory : Nitin Gadkari)

दौंड तालुक्यातील पाटेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग राऊत यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून कारखान्यात सीबीजी गॅस प्रकल्पाचे उद्‌घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

भविष्यात ग्रीन हायड्रोजन हेच इंधन असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनो यापुढे पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या दुचाकी, चारचाकी घेऊ नका. ही गरज भागविण्यासाठी साखर कारखानदारांनी साखरेऐवजी इथेनॉल निर्मिती करावी. भविष्यात अन्नदाता शेतकरी ऊर्जादाता होणार आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांची प्रगती होणार नाही, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

गडकरी म्हणाले, ग्लोबल इकॉनोमीमध्ये सध्या फळे, खते आणि इंधन या तीन गोष्टींवर चर्चा चालू आहे. भारत दरवर्षी दहा लाख कोटी रुपयांचे इंधन आयात करतो आहे. ती आयात भविष्यात कमी करायची आहे. देशात सध्या चारशे पन्नास करोड लिटर इथेनॉल तयार होत आहे. वीस टक्के इथेनॉल मिसळण्यासाठी देशाला एक हजार कोटी लिटर इथेनॉलची गरज लागणार आहे. पेट्रोलइतकेच इथेनॉल अवरेज देऊ शकणारे संशोधन पूर्ण झाले असून भारत सरकारने त्याला मान्यता दिली आहे. साखर कारखान्यांनी इथेनॉल आणि सीएनजी पंप उभारले पाहिजेत. कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर सीएनजीवर कन्वर्ट केले पाहिजेत. स्वदेशी इंधन ही आपली गरज आहे. देशात दरवर्षी जनसेटला दोन लाख कोटी लिटर डिझेल लागत आहे. हे जनसेट इथेनॉलवर चालवण्याची गरज आहे.

या वेळी पांडुरंग राऊत म्हणाले, कारखान्याच्या प्रगतीत शेतकरी, कामगार व जनसेवा बँकेचा मोठा वाटा आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे, आमदार राहुल कुल व अशोक पवार, उद्योजक प्रमोद चौधरी, साखर आयुक्त शेखर गायकवाड, माजी आमदार रमेश थोरात, किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे, संघचालक नानाजी जाधव, सुहास हिरेमठ, विकास रासकर, अनुराज कारखान्याचे चेअरमन डॉ. माणिक बोरकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, दिलीप म्हेत्रे, प्रदीप कंद, आनंद थोरात, महेश भागवत, सुमंत हंबीर या वेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT