Pune NCP News : गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना आता दोन्हीकडच्या नेत्यांनी तूर्तास तरी फुल स्टॉप दिला असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी अद्याप या चर्चा थांबताना पाहायला मिळत नाहीत. सातत्याने याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत, तसेच यावर अनेक नेते बोलताना पाहायला मिळत आहेत. आज देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
आज मंगळवारी (ता.17) पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, विलीनीकरणाबाबत सध्या नव्याने कोणतीही चर्चा आमच्यापर्यंत आलेली नाही. विलनीकरण हा निर्णय त्या त्या पक्षाच्या प्रमुखांनी घ्यायचा असतो. त्यानुसार दोन्ही पक्षाचे अध्यक्ष त्याबाबत निर्णय घेतील.
पुणे जिल्ह्याचे बोलायचं झालं तर जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी बसून निर्णय घेतला होता. त्यानुसार सातारा आणि पुणे जिल्ह्यात एकत्रित निवडणुका लढवायच्या आणि त्या घड्याळ चिन्हावर लढवायच्या असा निर्णय झाला होता. त्यानुसार सर्व उमेदवार हे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढले आणि जिंकले देखील आहेत.
पुणे जिल्ह्याचा विचार केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्हावर निवडून आलेले. 51 सदस्य आहेत. ते घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवून जिंकून आलेले आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते राष्ट्रवादीचेच सदस्य आहेत त्यामुळे त्यातीलच सदस्य हे पदाधिकारी होतील. तसेच पुणे जिल्हा परिषद निवडणुक आम्ही एकत्रित लढलो असल्याने पदाधिकारी ठरवताना दोन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसून जिल्हा परिषदेत कोणाला पदाधिकारी बनवायचं आणि अध्यक्ष कोण होणार हे ठरवू असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, पुणे जिल्ह्यामध्ये निवडणुकीदरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित बसून निर्णय घेतला होता. त्या निर्णयावेळी अजितदादा, दिलीप वळसे पाटील, सुप्रियाताई आणि अमोल कोल्हे देखील होते. तसेच मी आणि दत्तात्रेय भरणे देखील उपस्थित होते.
याबाबतची एक बैठक मागील महिन्यात 18 तारखेला माझ्या घरी झाली होती. उद्या त्या बैठकीला एक महिना पूर्ण होईल. त्या बैठकीत सगळ्यांनी एक चिन्ह घेऊन लढायचं असं ठरलं होतं. तसेच ज्या ठिकाणी शक्य नसेल त्या ठिकाणी तुतारी आणि बहुतांश ठिकाणी हे घड्याळ चिन्ह घेऊनच लढण्याचा निर्णय त्या बैठकीत झाला असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले. त्यामुळे इथून पुढे 5 वर्ष घड्याळ चिन्हावरच जिल्हा परिषदेचा कारभार चालणार असल्याचे त्यांनी सांगितलं. तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या विषयावर बऱ्याच वेळा चर्चा झाली होती. असं देखील हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.