Harshvardhan Patil-Dattatray Bharane
Harshvardhan Patil-Dattatray Bharane Sarkarnama
पुणे

Dattatray Bharane : ‘१९ वर्षे मंत्री राहूनही काही न करणाऱ्या हर्षवर्धन पाटलांनी ‘लाकडी-निंबोडी’चे फुकटचे श्रेय घेऊ नये’

विनायक चांदगुडे

शेटफळगढे (जि. पुणे) : राज्याच्या मंत्रिमंडळात १९ वर्षे मंत्री असतानाही इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी काहीच न करणाऱ्या विरोधकांनी लाकडी-निंबोडी उपसा जलसिंचन योजनेचे विनाकारण फुकटचे श्रेय घेऊ नये, अशी टीका माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचे नाव न घेता केली. (Harshvardhan Patil should not take credit for Lakdi-Nimbodi Pani Yojana : Dattatray Bharane)

लाकडी-निंबोडी योजना मंजूर करून निधी उपलब्ध केल्याबद्दल तसेच निविदा काढल्याबद्दल इंदापूर तालुक्यातील लामजेवाडी येथे भरणे यांचा सत्कार करण्यात आला. त्या सत्काराला उत्तर देताना भरणे यांनी पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले.

भरणे म्हणाले की, विरोधकांनी १९९५ पासून प्रत्येक निवडणुकीत ही योजना करण्याबाबतची खोटी आश्वासने देऊन वेळ मारून नेली. मात्र, प्रत्यक्षात त्यासाठी काहीच केले नाही. मात्र, आम्ही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने ही उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न केला. सध्या योजनेची निविदा निघाली असून लवकरच या योजनेचे काम सुरू होणार आहे. लाकडी निंबोडी योजनेमुळे इंदापूर तालुक्यातील जवळपास, दहा हजार एकरापेक्षा जास्त क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

गेल्या दोन वर्षांपूर्वी ही योजना मार्गी लावण्याचे आम्ही जाहीर केले होते, त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात तरतूद करून या योजनेसाठी निधी उपलब्ध केला. तसेच, मुख्यमंत्र्यांकडून या योजनेसाठी मंजूर घेतली. या योजनेच्या मंजुरीचा आदेश ता. १२ मे २०२२ रोजी काढला. शेतकऱ्यांचा गेल्या ३० वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावला. या आपण या योजनेसाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना माहिती आहे, असेही भरणे यांनी स्पष्ट केले.

इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना निवडणुकीच्या काळात झुलवत ठेवून ही योजना मी केल्याचा आव विरोधक आणत आहेत. परंतु २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत विरोधकांना तालुक्यातील जनतेने जागा दाखवून दिली आहे. येत्या २०२४ च्या निवडणुकीतही इंदापूरची जनता विरोधकांना त्यांची जागा दाखवून देणारा आहे . कारण या परिसरातील व तालुक्यातील लोकांना शेतकऱ्यांसाठी व जनतेसाठी कोण काम करतोय, याची माहिती आहे, असा टोलाही भरणे यांनी लगावला.

लाकडी निंबोडी सिंचन योजनेबरोबरच इंदापूर तालुक्यातील २० गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आपण मंत्री असताना उजनीतून खडकवासला कालव्यात पाणी आणण्याचा निर्णय घेतला. मात्र, तो प्रयत्नही राजकारणासाठी तालुक्यातील विरोधकांनी सोलापुरातील लोकांना भडकावून हाणून पडला आहे, हे तालुक्यातील जनतेला माहिती आहे, त्यामुळे जनता विरोधकांना पूर्णपणे ओळखून आहे. त्यामुळे त्यांनी श्रेय घेण्याचा कांगवा केला तरी तालुक्यातील हुशार जनता विरोधकांना तिसऱ्यांदा त्यांची जागा निवडणुकीत दाखविणार आहे, त्यामुळे विरोधकांनी विनाकारण या योजनेचे श्रेय घेण्याचा खटाटोप करू नये, असेही भरणे यांनी सांगितले.

या वेळी विजय धुमाळ, प्रताप पाटील, हनुमंत बंडगर, संतोष काका वाबळे, माऊली भोसले, सरपंच शीतल धुमाळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले, तर गोपाळ धुमाळ यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT