Jayant Patil-Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Jayant Patil: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंबंधी अजित पवारांशी किती वेळा चर्चा झाली? जयंत पाटलांनी थेट आकडाच सांगितला

Jayant Patil: कार्यकर्त्यांच्या शंका आणि संघटनात्मक मुद्द्यांवरही आम्ही बोललो होतो, अशी माहिती देखील जयंत पाटील यांनी दिली.

सरकारनामा ब्युरो

NCP Merger Jayant Patil Statement: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार व माझी अकरा वेळा चर्चा झाली होती. कार्यकर्त्यांच्या शंका आणि संघटनात्मक मुद्द्यांवरही आम्ही बोललो होतो. विलीनीकरण झाल्यास घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्याचीही चर्चा आम्हा दोघांमध्ये झाली होती, " असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी शनिवारी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील उपचार पूर्ण झाल्यानंतर शनिवारी त्यांना खासगी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. पवार यांची भेट घेतल्यानंतर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले, "विलीनीकरणाबाबत मी व अजित पवार सकारात्मक होतो. दादा अनेकदा माझ्या घरी आले होते, त्यांच्या बाजूने ही चर्चा सुरू झाली होती. एकत्र आल्यास घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्याचे आम्ही ठरविले होते. विलीनीकरण झाल्यास सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय देता येईल, अशी आम्हा दोघांची भावना होती. मात्र ज्या नेत्यांबरोबर आमची चर्चा झाली ते आता आपल्यात नाहीत. मागील काही दिवसांपासून वेगवगेळ्या नेत्यांची विधाने मी वाचत आहे, त्यावर मी काही बोलणार नाही. सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे हे निर्णय घेण्यास सक्षम आहेत. आता विलीनीकरणावर बोलावे असे मला वाटत नाही."

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना विलीनीकरणाबाबत माहिती होती का ? या प्रश्नावर पाटील म्हणाले, "सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांना आम्ही बारामतीमध्येच भेटलो होतो. काही प्रश्न निर्माण झाले तर आम्ही येऊ, असे त्यांना सांगितले होते. त्यांच्यासमोर आम्ही कोणत्याही अडचणी ठेवल्या नव्हत्या.

पाटील पुढे म्हणाले, शरद पवार हे बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी सोडलं आहे. पुढील २ ते ३ दिवसांनी ते मुंबईला जातील. पवार यांच्याशी राजकीय विषयावर चर्चा झाली नाही. शशिकांत शिंदे काय बोलले मला माहिती नाही. १७ तारखेला होणाऱ्या बैठकीस नक्की जाईल. राजकारणात उद्या काय होईल, सांगता येत नाही. रोहित पवार यांनी मांडलेल्या मुद्द्यांची चर्चा झाली पाहिजे. तपास यंत्रणांनी विमान अपघाताचा तपास पारदर्शकपणे करावा. आम्ही विरोधी पक्षातच आहोत. सांगली जिल्हा परिषदेसाठी एका जागेची गरज आहे. सत्ता स्थापनेसाठी अजून चर्चा नाही, बाकी चंद्रकांत पाटील यांनाच विचारा, असंही यावेळी जयंत पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT