Nana Patole Sarkarnama
पुणे

Maratha Reservation : जरांगे जर मुंबईत पोचले, तर महाराष्ट्राचे मणिपूर करणार का?; नाना पटोले यांचा सरकारला सवाल

Sudesh Mitkar

Pune News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मंगळवारी त्यांचा पुण्यामध्ये मुक्काम असून उद्या सकाळी ते मुंबईच्या दिशेने रवाना होतील. जरांगे पाटील सोबत हजारो मराठा कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.

इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन मुंबईमध्ये पोहोचल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुण्यात केलेले विधान महत्वपूर्ण मानले जात आहे.

पुण्यामध्ये मंगळवारी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे. या बैठकीला नाना पटोले यांनी उपस्थिती लावली आहे. त्या बैठकीदरम्यान पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला पटोले म्हणाले, गोविंदगिरी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावर बोलताना पटोले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इतिहासात सातत्याने छेडछाड केली जाते आहे. अनेकदा आपल्या राजांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र, महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांची तुलना होऊच शकत नाही.

आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत बोलताना पाटोले म्हणाले, हे सरकारच पाप आहे. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस (devendra Fadanvis) सांगत होते की राज्य सरकारला आरक्षण देण्याचे आधिकार आहेत. या बाबतचे व्हिडिओ देखील आता व्हायरल होत आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे. तरी देखील सरकार मराठा समाजाला आरक्षण का देत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हे आंदोलन जर मुंबईत पोहचले तर काय परिस्थिती होईल, जी परिस्थिती मणिपूरमध्ये झाली ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये करायची आहे का असा सवाल देखील त्यांनी सरकारला केला. सरकार केवळ आरक्षणाच राजकारण करत आहेत.मात्र त्यांनी हा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा, असे पटोले म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला सगळे श्रीमंत लोक उपस्थित राहिले होते. मात्र, प्रभू श्री राम हे गरिबांचे होते असे ते म्हणाले. हे लोकांना वेडे समजतात मात्र हे येड्याचं सरकार आहे. मराठा आणि ओबीसी वाद हे निर्माण करून ध्रुवीकरण करण्याचं काम हे सरकार करत आहे. मात्र, जनता सुज्ञ असल्याचे पटोले यांनी सांगितले.

राज्यातले सगळे उद्योग हे घेऊन पळाले आहेत. अनेक उद्योगपती आपल्या राज्यात मोठे झाले आणि आता सांगतात की मी गुजराती आहे. पण व्यापार करण्यासाठी त्यांना मुंबईत यावेच लागेल, अशी टीका त्यांनी अंबानी यांच्यावर केली.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT