Pcmc
Pcmc  Sarkarnama
पुणे

स्थायी समितीवरील छाप्यानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांचे पाकिट झाले बंद?

सरकारनामा ब्यूरों

पिंपरी : पिंपरी-चिंचवड स्थायी समितीतील (PCMC Standing Committee) लाचखोरी तथा टक्केवारीप्रकरणी एक वगळता बाकीच्या सर्व १४ स्थायी समिती सदस्यांची चौकशी मुदतीच्या (ता. २९ सप्टेंबर) एक दिवस आधी आज (ता.२८ सप्टेंबर) पूर्ण झाली.

राष्ट्रवादीच्या (NCP) स्थायी सदस्या पोर्णिमा सोनवणे यांची शुगर वाढल्याने त्या सध्या रुग्णालयात दाखल आहेत. तर, याच पक्षाच्या स्थायी सदस्या सुलक्षणा शिलवंत-धर यांचा जबाब आज नोंदविण्यात आला. लाचखोरीशी सबंध नसल्याचे त्यांनीही आधीच्या चौकशी झालेल्या सदस्यांप्रमाणेच सांगितले. दरम्यान, लाचखोरीचे हे कंत्राट जुने असल्याने यापूर्वीचे स्थायी अध्यक्ष तथा सभापतींचीही आता चौकशी होण्याची शक्यता आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागातून (एसीबी) त्याला आज दुजोरा देण्यात आला. त्यामुळे यापूर्वीच्या सत्ताधारी भाजपच्या (BJP)चार अध्यक्षांची चिंता वाढली आहे.

१८ ऑगस्ट रोजी पिंपरी पालिकेच्या इतिहासात प्रथमच स्थायी समितीवर एसीबीची धाड पडली. त्यात स्थायीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे, त्यांचे पीए ज्ञानेश्वर पिंगळे व इतर तीन कर्मचाऱ्यांना एका ठेकेदाराकडून एक लाख वीस हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते. मंजूर निविदेच्या तीन टक्के लाच मागून ती दोन टक्के घेण्यात आली होती. दरम्यान, दर आठवड्याच्या स्थायीच्या बैठकीनंतर १६ पाकिटे द्यावे लागतात, असा जबाब पिंगळेंनी दिला होता. त्यानुसार स्थायीच्या बाकीच्या सर्व १५ सदस्यांना नोटीस काढून २९ तारखेपर्यंत त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास एसीबीने सांगितले होते. त्यानुसार टप्याटप्याने ही चौकशी झाली.

राष्ट्रवादीचे चार सदस्य स्थायीत आहेत. त्यातील राजू बनसोडे आणि प्रवीण भालेकर यांची काल (ता.२७ सप्टेंबर) एसीबीने चौकशी केली. भाजपच्या इतर सर्व नऊ सदस्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. तर, शिलवंत-धर यांचा जबाब आज नोंदविण्यात आला. पाकिट मिळते का, स्थायी समिती अध्यक्षांचे पीए ज्ञानेश्वर पिंगळें व ठेकेदार कोहलीला ओळखता का? असे इतर सदस्यांना विचारण्यात आलेले प्रश्नच त्यांनाही विचारण्यात आले. स्थायीत नियु्क्ती ही पैशासाठीच केली जाते का? असा प्रश्नही त्यांना विचारला गेला.

यानंतर आठवड्याच्या स्थायीच्या सभेनंतर सोळा पाकिटे द्यावी लागतात, असे पिंगळेंनी सांगितले आहे. असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या, लाच घेतल्याने अडचणीत आल्याने त्यांनी तसा जबाब दिला असावा. स्वत:ला वाचविण्याकरिता त्यांनी स्वताच्या गळ्यातील हा साप आमच्या गळ्यात सोडला आहे. आम्ही आमच्या पक्षाचाच अजेंडा स्थायीत राबवतो, कुठल्या विषयाला विरोध करायचा वा मंजूरी द्यायची हे आमचे नेते (विरोधी पक्षनेते) सांगतात. त्यानंतरही जर विषय सत्ताधाऱ्यांनी रेटून मंजूर केला, तर त्याविरोधात आयुक्तांकडे दाद मागतो. तर, कधी पत्रकार परिषद घेतो, असा बचाव त्यांनी केला.

दरम्यान, स्थायी समितीवरील एसीबीच्या धाडीनंतर विषयांना विरोध करणाऱ्या सदस्यांचे पाकिट बंद झाल्याचे विरोधी पक्षाच्या एका सदस्याने आज `सरकारनामा`ला सांगितले. बहुमत असल्याने महापालिकेतील सत्ताधारी भाजप स्थायीत आम्हाला विचारत नसल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT