Jayant Patil  Sarkarnama
पुणे

Jayant Patil News : पुण्यातील पोलिस व्यवस्था झाली दुबळी, सरकारचे लक्षच नाही; जयंत पाटलांनी केला गंभीर आरोप

Sachin Waghmare

Pune News : पुण्यात सहायक पोलिस निरीक्षकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर कोयत्याने वार करत त्यांना जखमी करण्यात आले आहे. या कोयता टोळीच्या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर राज्यातील पोलीस प्रशासन हादरले आहे.

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांत वाढ होत आहे. हे संपूर्ण राज्य सरकारचे अपयश आहे. एका व्यक्तीला मी दोष देणार नाही. मुख्यमंत्र्यांपासून संपूर्ण सरकार फेल गेले आहे. महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही. बालकांचे संरक्षण करु शकत नाहीत. आता पोलिसांचंही संरक्षण करण्याची समस्या तयार झालेली आहे. पोलिसांवरही हल्ले होऊ लागले आहेत. याचा अर्थ महाराष्ट्रातील पोलिसांचा मोरल लो करण्याचे काम या सरकारने केले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayanat Patil) यांनी केली.

पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. पुण्यात वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी या हल्ल्यावरुन चिंता व्यक्त केली. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे, कायदा व सुव्यवस्था ढसाळली आहे, असेही पाटील म्हणाले.

पुण्यातील घटना पाहता पोलिसांचा वचक राहिलेला नाही. गृहखात्याचा भोंगळ कारभार आहे. पोलीस अधिकाऱ्यांचा मॉरल लो झालेला आहे. गुन्हेगारच प्रबळ होऊ लागले आहेत, याचा आज पुण्यात अनुभव आला. महाराष्ट्र पोलीस दलाच्या मागे सरकारने ठाम उभा राहिले पाहिजे. महाराष्ट्र सरकारने भूमिका घेतली पाहिजे. सरकारचे राज्याच्या प्रशासनाकडे आणि पोलीस खात्याकडे लक्ष नाही. पुण्यातील पोलीस व्यवस्था किती दुबळी झाली आहे हे दिसून येत आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, 'अशा प्रकारच्या घटनेवरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा', अशी मागणी केली असल्याचे पत्रकाराने सांगितले. यावर बोलताना जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना मिश्किल टोला लगावताना ते म्हणाले, असे आहे की, आता दोन महिनेच राहिलेले आहेत. 2 महिन्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागण्यात काही अर्थ आहे, असे मला वाटत नाही.

गुन्हेगारांचा फोटो राजकारण्यांसोबत दिसू लागणे हे फार गंभीर आहे, पण कधी कधी अपघातानं पण होऊ शकतं. मी त्याला दोष देणार नाही. जर वारंवार असं होत असेल तर आणि राजकारणी जर गुन्हेगाराला घेऊन फिरत असेल तर ते गंभीर आहे. पोलिसांवर हल्ले होऊ लागलेत, त्यामुळे पोलीस दुबळा झालाय का? असाही प्रश्न निर्माण झालाय, असंही जयंत पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT