Jayant Patil
Jayant Patil sarkarnama
पुणे

'मंत्री सावंत यांना सत्तेची मस्ती आलीय; म्हणून मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये!'

उत्तम कुटे : सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : आमची सत्ता येताच मराठा समाजाला आरक्षणाची खाज कशी सुटली, या राज्याचे आरोग्यगमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या आक्षेपार्ह विधानाचे सध्या राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सावंत यांची तत्काळ मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. तर, सावंत यांना सत्तेची मस्ती वाढली असून त्यातून त्यांनी हे निषेधार्ह व अत्यंत गंभीर वक्तव्य केले, असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) आज (ता.२६) केला.

सावंत यांच्या तोंडातून, माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. असे आम्ही समजतो. तसेच त्यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार शिंदे-फडणवीसांनी सावंताना दिला आहे, असा हल्लाबोल पाटील यांनी यावेळी केली. देशात न्यायव्यवस्था शिल्लक असेल, तर राज्यातील सत्तासंघर्षात आमच्या बाजूने निकाल लागेल, अशी टिपण्णी त्यांनी यावेळी केली. जनतेचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास त्यातून कायम राहिल, सिद्ध होईल, असे ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयातूनच राज्यात मध्यावधी निवडणूक होतील वा राष्ट्रपती राजवट लागेल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. पिंपरी-चिंचवड शहर पक्षाची आढावा बैठक घेतल्यानंतर ते बोलत होते. यावेळी भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे-पाटील शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, महिलाध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेवक शाम लांडे, विनोद नढे, राहूल भोसले, पंकज भालेकर. प्रवक्ते विनायक रणसुंभे आदी यावेळी हजर होते.

महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास शिंदे-फडणवीस सरकार घाबरत असून त्यामुळे ते त्या लांबणीवर टाकत आहेत, असा दावा पाटील यांनी यावेळी केला. पाकिस्तान झिंदाबादच्या पुण्यात झालेल्या घोषणाबाजीवरून त्यांनी राज्य सरकारवर आसूड ओढला. त्यांचे नियंत्रण नसल्याने ही गंभीर घटना घडल्याचे ते म्हणाले. प्रभागरचना तीनऐवजी चारची केली, तरीही राष्ट्रवादीला कसलाही फरक पडणार नाही, हे स्पष्ट करीत पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यात भाजपला एनसीपीची भीती वाटते आहे. म्हणून त्यांनी आम्हाला लक्ष्य केले आहे, असे ते म्हणाले.

त्यांचा रोख हा बारामती व शिरूर या राष्ट्रवादीचे खासदार असलेल्या मतदारसंघात भाजपने व त्यांच्या केंद्रीय मंत्र्यांनी काढलेल्या संवाद यात्रेच्या दिशेने होता. अजित पवार नाराज असल्याचे म्हणणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना मंत्रीपद का देण्यात आले नाही, याची चिंता करावी, अजितदादा आमच्याशी जास्त बोलतात, का बावनकुळेंशी, असा टोला त्यांनी लगावला. बावनकुळेंची समजूत घालून त्यांना अध्यक्ष केले गेले आहे. त्यामुळे या सरकारात बदल व्हावा आणि आपण पुन्हा मंत्री व्हावे, असे त्यांना वाटत असावे, अशी कोपरखळी त्यांनी मारली. अजित पवार नाराज असण्याचे काही कारण नाही, तशी काही घटनाही घडलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT