Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar : ''कसबा भाजपचा बालेकिल्ला कधीच नव्हता; पण बापटांनी राखला होता''

सरकारनामा ब्यूरो

Politics : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा दणदणीत विजय झाला.

तर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली होती. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय झाल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर भाष्य केलं आहे.

''कसबा विधानसभा मतदारसंघ हा कधीही भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला नव्हता हा मतदारसंघ गिरीश बापट यांचा बालेकिल्ला होता'',असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवार माध्यमांशी बोलत होते.

पवार म्हणाले, ''कसबा पोटनिवडणुकीत यश मिळेल असे ऐकण्यास मिळत होते. पण मला याची खात्री नव्हती. त्याचे मुख्य कारण नारायण, सदाशिव, शनिवार पेठ हे होते. हा सर्व भाग भाजपचा गड आहे असे अनेक वर्षे बोलले जाते. याठिकाणी बापटांनी अनेक वर्ष प्रतिनीधित्व केले.

बापट यांचे वैशिष्ट्य असं की भाजपची विचारधारा न मानणारा जो पुण्यातील वर्ग आहे त्या सर्वांशी बापट यांनी मैत्रीचे संबंध ठेवले आहेत. त्यामुळे बापट यांचे लक्ष ज्याठिकाणी अधिक केंद्रीत आहे तो मतदारसंघ आपल्याला जड जाईल असा अंदाज आमचा होता. मात्र, शेवटी एक गोष्ट लक्षात आली की त्यांच्या सल्ल्यांनी निर्णय घेतला गेला नाही, अशी कुजबूज ऐकायला मिळाली.

याचा अर्थ बापट आणि टिळकांना डावलून काही निर्णय घेतल्यास त्याचे काय परिणाम होतील अशी चर्चा होती. कदाचित त्याचा फायदा होईल अशी शंका होतीच. पण निवडणूक झाल्यावर मी घेतलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीला लोकांनी निवडून दिले ती व्यक्ती वर्षानुवर्षे सामान्य लोकांमध्ये कशाचीही अपेक्षा न करता काम करणारी होती.

तसेच हा उमेदवार कधीच चार चाकीत बसत नाही तर दोनचाकीवाला आहे. त्यामुळे दोन पाय असलेल्या मतदारांचे लक्ष यांच्याकडे आहे. तसेच पक्षाचा पाठींबा, महाविकास आघाडीतील सर्व घटक याठिकाणी मनापासून राबले याचा हा परिणाम आहे, असे आमचे निरीक्षण आहे'', असं पवार म्हणाले.

''महाराष्ट्रात लोकांना बदल हवा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभेसंदर्भात महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील लोकांना एकत्रित ठेवून एकत्रित निर्णय घेणे हा माझा एक प्रयत्न राहणार आहे''.

''देवेंद्र फडणवीस यांनी कसबा निवडणुकीत ज्यांचा विजय झाला ते उमेदवार महाविकास आघाडीचे होते हे तरी मान्य केले. निवडणुकीपूर्वी त्यांची वक्तव्य काय होती ते वाचनात आले, त्यामध्ये आता थोडा गुणात्मक बदल आहे. कमीत कमी निवडून आलेल्या व्यक्तीबद्दल ते चांगले बोलतात ही चांगली गोष्ट आहे'', असंही पवार यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT