ajit pawar narendra modi sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : 'भटकती आत्मा' कोणाला म्हटलं हे पंतप्रधानांना विचारणार? अजित पवार म्हणाले...

Akshay Sabale

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांना अप्रत्यक्षपणे 'भटकती आत्मा' म्हटलं होतं. यावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका होत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ), खासदार संजय राऊत, आमदार रोहित पवार यांनी मोदींचा समाचार घेतला आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?

"महाराष्ट्र राज्य एका भटकत्या आत्म्याचा शिकार झाले आहे. या खेळाला एका नेत्याने 45 वर्षांपूर्वी सुरुवात केली. ज्या लोकांची स्वप्ने पूर्ण होत नाहीत, अशी माणसे दुसऱ्याची स्वप्ने पूर्ण होऊ देत नाहीत. असे भटकते आत्मे दुसऱ्याची स्वप्ने बिघडवितात. त्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र अस्थिर झाला. काही मुख्यमंत्र्यांना कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. विरोधकांबरोबरच देश, राज्य, पक्ष आणि कुटुंबही या आत्म्याने अस्थिर केले. भाजपचे सरकार पाडण्याचा प्रयत्नही या आत्म्याने केला. या परिस्थितीत देशाला स्थिर सरकार हवे आहे. या अतृप्त, भटकत्या आत्म्यांपासून देशाला वाचविण्याची आवश्यकता आहे. भाजप-रालोआ सरकार महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर घेऊन जाईल," असं मोदींनी ( Narendra Modi ) म्हटलं होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"पंतप्रधानांना विचारणार कुणाला उद्देशून वक्तव्य केलं?"

यावर अजित पवार ( Ajit Pawar ) म्हणाले, "पंतप्रधान मोदी कुणाबद्दल बोलले, हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही. पुढील सभेला मी उपस्थित असेन. तेव्हा पंतप्रधान मोदींना भटकती आत्माचं नाव काय आणि कोणाला उद्देशून हे वक्तव्य केलं आहे, हे विचारेन. मग, प्रसारमाध्यमांना सांगेन."

जयंत पाटलांनी काय म्हटलं?

"नरेंद्र मोदी यांनी मतमोजणीनंतर लक्षात येईल की, ही भटकती आत्मा नसून, ही भारताची आणि खास करून महाराष्ट्राची आत्मा आहे. महाराष्ट्राचा आत्मा म्हणून शरद पवार यांच्याकडे आज उभा महाराष्ट्र बघतो आहे. महाराष्ट्रात आल्यानंतर केवळ शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर टीका करणं, याशिवाय पंतप्रधानांना काही बोलताच येत नाही. आम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंपासून अटल बिहारी वाजपेयीपर्यंत अनेकांची भाषणं ऐकली. पण, विरोधकांवर नाहक टीका करण्याचं काम आजवरच्या कोणत्याही पंतप्रधानांनी केलेलं नाही. आपलं काम न सांगता टीका करणं नरेंद्र मोदींना शोभत नाही, असं मला वाटतं," अशा शब्दांत जयंत पाटलांनी ( Jayant Patil ) टीकास्र डागलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

"पंतप्रधान मोदींचा एक अतृप्त आत्मा आहे. नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय. जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, मराठी माणसाचे शत्रू आहेत, असे अनेक आत्मे महाराष्ट्रात साडेचारशे वर्षांपासून भटकत आहेत. ज्यांना महाराष्ट्रानं गाडलं होतं," असा घणाघात संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर केला होता.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT