Jejurikar Boycott Election Sarkarnama
पुणे

Jejurikar Boycott Lok Sabha Election : जेजुरीकर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार; काय आहे कारण?

Sunil Balasaheb Dhumal

Baramati Lok Sabha Politics : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती मतदारसंघात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. त्या काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांचे महायुतीतील बंड थंड होत नाही, तोच जेजुरीकरांनी निवडणुकीच्या तोंडावर सरकारला मोठा इशारा दिला आहे. जेजुरीतील पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार, असे जेजुरीकरांनी जाहीर केले आहे. Jejurikar Boycott Lok Sabha Election

जेजुरी (Jejuri) देवसंस्थान समितील स्थानिकांना वगळल्यानंतर जेजुरीत ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेतल्यानंतर ते थांबले. आता पाणीटंचाईवरून जेजुरीकर आक्रमक झाले आहेत. जेजुरी शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परिणामी दहा दिवस पाणी आले नसल्याने नागरिकांनी नगरपालिकेत संताप व्यक्त केला. येत्या आठ दिवसांत पाण्याची समस्या सुटली नाही, तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालणार, असा थेट इशाराच जेजुरीकरांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जेजुरीत दोन महिन्यांपासून पाणीटंचाई सुरू आहे. दरम्यान दहा दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नाही. याबाबत नागरिकांनी आपले गाऱ्हाणे मुख्याधिकाऱ्यांना सांगितले. बैठकीत आक्रमक ग्रामस्थांनी होळकर तलाव भरून वाहतो, मात्र पाणी साठवण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. पाणी आले की वीज खंडित केली जाते, याकडेही लक्ष वेधले. त्यावर उपाय म्हणून वीर धरणातून जेजुरीसाठी कायम पिण्यासाठी पाणी द्यावे, टंचाईच्या काळात प्रत्येक प्रभागात टँकर सुरू करावेत, एमआयडीसीच्या पाणी योजनेतून शहराला पाणी द्यावे, ठिकठिकाणी हातपंप सुरू करावेत, विहिरी अधिग्रहण कराव्यात, दुष्काळात नाझरे धरणातील गाळ काढावा आदी मागण्याही नागरिकांनी केल्या. (Latest Political News)

नाझरे धरणातील पाणी फेब्रुवारीत संपल्याने मांडकी डोहावरील योजनेतून पाणीपुरवठा सुरू केला. मात्र, पुरेसा पुरवठा होत नसल्याने शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. या टंचाई काळात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने जलवाहिन्याही वारंवार फुटत आहेत. त्याचाही फटका शहराला बसतो. एमआयडीसी योजनेतून दररोज किमान वीस लाख लिटर पाणी कमी दराने मिळण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे. तर वीर धरणातील योजनेसाठीचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे, असे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी आंदोलकांना स्पष्ट केले. मात्र, आठवड्यात पाणीपुरवठा सुरळीत होतो की नाही आणि ग्रामस्थ काय भूमिका घेणार, याकडे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT