amol kolhe Mangaldas Bandal shivajirao adhalrao patil
amol kolhe Mangaldas Bandal shivajirao adhalrao patil sarkarnama
पुणे

Mangaldas Bandal News : पैलवान बांदल डाव टाकणार, पण चितपट कोण होणार?

उत्तम कुटे: सरकारनामा

Pimpari Chindhwad News : महाविकास आघाडीबरोबरची युती फिसकटल्यानंतर वंचित बहुजन विकास आघाडीने ( Vanchit Bahujan Aghadi ) महाराष्ट्राती़ल लोकसभेचे उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मंगळवारी ( 2 एप्रिल ) 'वंचित'ने पाच नावे जाहीर केली. त्यात शिरूरमध्ये 'वंचित'ने पैलवान मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिल्याने तेथील निवडणुकीत आता ट्विस्ट आला आहे. कारण, त्यामुळे तेथे दुरंगी नाही, तर तिरंगी लढत आता होणार आहे.

"भाजप वगळता इतर सर्वच राजकीय पक्षांनी सध्या संविधान वाचविण्याची मोहीम उघडली आहे. त्यामुळे ते लिहिलेल्यांच्या ( भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ) नातवाने ( प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर )उमेदवारी देणे यापेक्षा आणखी काय हवं," अशी पहिली प्रतिक्रिया पैलवान बांदल ( Mangaldas Bandal ) यांनी 'वंचित'ने त्यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर 'सरकारनामा'ला दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"कोल्हे ( Amol Kolhe ) हे पाच वर्षांत मतदारसंघात फिरकले नाहीत, तर आढळराव ( Shivajirao Adhalrao Patil ) हे आयात उमेदवार आहेत. त्या दोघांनाही या पैलवानाचा फटका सहन होणार नाही. सहाही विधानसभा मतदारसंघांत आपली ताकद आहे," असा दावा बांदलांनी केला.

2009 ला शिरूर विधानसभेला पराभूत झालेल्या बांदलांनी गतवेळी लोकसभेची तयारी केली होती. मात्र, राष्ट्रवादीने कोल्हेंना तिकीट दिले. या वेळी त्यांनी त्यासाठी सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली होती. 2019 च्या लोकसभेला वंचितचा फटका आघाडीला सात जागांवर बसला होता. या वेळी जर ती शर्यत कायम राहिली, तर शिरूर नाही, जेथे जेथे 'वंचित'चे उमेदवार आहेत, तेथे महाविकास आघाडीला पुन्हा झळ बसणार आहे. याचा युतीला फायदा होणार आहे. शिरूरमध्ये आघाडीच्या कोल्हेंना बांदलांचा फटका काही प्रमाणात बसून तेवढा फायदा युतीच्या आढळरावांना होऊ शकतो.

भोसरीचे नाही, पण शिरूरचे पैलवान रिंगणात

शिरूरच्या आखाड्यात भोसरीचे पैलवान आमदार महेशदादा लांडगे यांनी उतरण्याची तयारी केली होती. पक्षाला ही जागा भेटली आणि त्यांनी उमेदवारी दिली, तर लढण्याची तयारी असल्याचे त्यांनी दोनदा सांगितले होते. पण, युतीत शिवसेनेच्या वाट्याची ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं खेचल्यानं महेशदादांचा प्रश्न निकालात निघाला. त्यामुळे ही लढत थेट होणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

मात्र, बांदलांच्या एन्ट्रीनं त्यात मोठा ट्विस्ट आला. कारण त्यांच्या उमेदवारीमुळे आघाडीला मिळणारी मुस्लिम आणि दलित मते ही आता वंचितकडे वळणार आहेत, तर मराठा असल्याने या समाजाची काही मते बांदल घेतील. त्याचा थोडा फटका दुसरे मराठा उमेदवार आढळरावांना बसेल. बांदलांमुळे विजयी उमेदवाराचे लीड, मात्र घटणार आहे. दुसरीकडे आघाडीला त्यातही ही लढत प्रतिष्ठेची केलेल्या शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला शिरूरला अधिक घाम गाळावा लागणार आहे, यात वाद नाही.


( Edited By : Akshay Sabale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT