Devendra Fadnavis, Eknath shinde, Ajit Pawar sarkarnama
पुणे

Loksabha Election 2024 : महायुतीच्या मेळाव्याचा प्रभाव ओसरला? मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर इच्छुकही शांत!

Shital Waghmare

Dharashiv : धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीमधील 14 पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या हातात हात घालत लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तीन दिवसांपूर्वी शिवसेनेचा संकल्प मेळावाही झाला. लोकसभा निवडणुकीसाठी धाराशिवमध्ये महायुतीकडून जोरदार तयारी असल्याचे चित्र दिसत होते. मात्र, मुख्यमंत्री यांच्या मेळाव्याच्या अवघ्या तीन दिवसांतच हे चित्र बदलले आहे. शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दिसलेला इच्छुकांचा उत्साह अवघ्या तीन दिवसांमध्येच मावळला.(Loksabha Election 2024)

मेळाव्याला जिल्हाभरातील कार्यकर्ते आले होते. त्या निमित्ताने जेवणावळ ही झाली. मेळावा संपला आणि महायुतीचा प्रभाव ओसरला की काय? असे एकूण राजकीय चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे महायुतीकडून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आळीमिळी गुपचिळी,अशी भूमिका स्वीकारलेली दिसून येत आहे. महायुतीचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा संपल्यानंतर तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन तालुका आणि बुथ पातळीवर मेळाव्या आयोजित करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र त्यात पुढे कोणतीही प्रगती झाली असल्याचे पहायला मिळत नाही.

लोकसभा निवडणुकीचा बिगुल अद्याप वाजलेला नाही. मात्र रणसंग्राम पेटला आहे. इच्छुकांनी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नाना क्लुप्त्या लढवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महायुतीच्या विविध 14 घटक पक्षात समन्वय राहावा याकरिता प्रमुख 10 पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून समन्वय समिती तयार करण्यात आली आहे. मात्र समन्वय समितीची एक बैठक वगळता पुढे काहीच झाले नाही. या बैठकीनंतर मोठ्या जल्लोषात जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. त्याला प्रतिसादही मोठा मिळाला. पालकमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant), आमदार राणाजगजीतसिंह पाटील(Ranajagjitsinha Patil), राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

मात्र लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून इच्छुक असलेले माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना या मेळाव्यात बोलण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे लोहारा उमरगा परिसरातील रवींद्र गायकवाड यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी मित्र पक्षाचे कान पिळायलाही मागेपुढे पाहिले नाही. या मेळाव्यात ना मतदारसंघावर दावा केला ना उमेदवारीची घोषणा केली. एकमेकांमध्ये समन्वय राहावा यासाठी नियुक्त केलेल्या समन्वय समितीचे पदाधिकारी पालकमंत्री सावंत यांनी कान-पिचक्या घेतल्यानंतर जाब कुणाला विचारणार? अशी अवस्था मित्र पक्षांची झाली आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवारी सध्या चिडीचूप आहेत.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT