Daund Nagarpalika : दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते प्रेमसुख कटारिया यांचे नागरिक हित संरक्षण मंडळाचे पॅनेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यातच मुख्य लढत होत आहे. निष्ठेपेक्षा निवडून येण्याची क्षमता या निकषावर उमेदवार दिले गेल्याने अनपेक्षित समीकरणे तयार झाली आहेत. मागील निवडणूक लढविणारा भाजप यंदा निवडणुकीच्या रिंगणात देखील उतरला नाही.
नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने माजी नगराध्यक्ष इंद्रजित कृष्णराव जगदाळे यांच्या कन्या दुर्गादेवी जगदाळे यांना उमेदवारी दिली आहे. तर नागरिक हित संरक्षण मंडळाकडून मोनाली प्रमोद वीर व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कोमल रूपेश बंड यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे जगदाळे, वीर आणि बंड यांच्यात मुख्य लढत होणार आहे.
प्रेमसुख कटारिया यांनी बेरजेचे राजकारण करीत पारंपरिक विरोधकांच्या नातेवाइकांना त्यांच्या पॅनेलमध्ये स्थान दिले आहे. समाजातील सर्व थरांशी असलेला थेट संपर्क असल्याने ते बंडखोरी थोपविण्यात काही प्रमाणात यशस्वी झाले. त्याचबरोबर राष्ट्रवादीमधील काही पदाधिकाऱ्यांचे त्यांनी ऐनवेळी पॅनलमध्ये स्वागत करीत उमेदवारीदेखील दिली. त्यांनी परिणामकारक डावपेच आखत स्थानिक आघाडी उभारून दोन्ही राष्ट्रवादीला आव्हान दिले आहे.
राष्ट्रवादीसाठी माजी नगराध्यक्ष वीरधवल जगदाळे, इंद्रजित जगदाळे यांनी पूर्ण पॅनेल उभे करून सर्व घटकांना समावून घेतले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षपदासह सदस्यपदांच्या २६ जागा निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. मागील निवडणुकांमधील चुका दुरुस्त करण्यासह जे पक्ष सोडून गेले त्यांचा विचार न करता राष्ट्रवादीचे पदाधिकारी मतभेद विसरून एकदिलाने काम करीत आहेत.
महाविकास आघाडीला शहरात तिसरा पर्याय देत मतविभाजनाचा फायदा उचलण्याची नामी संधी होती. परंतु काही पदाधिकाऱ्यांची निष्ठा देखील सोईने बदलल्याने आघाडी चाचपडत आहे. भाजपमध्ये पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तीनिष्ठा वरचढ ठरल्याने नामुष्की टाळण्यासाठी चिन्हावर निवडणुका न लढविण्याचा निर्णय घेतला. पक्ष संघटन सशक्त करण्यापेक्षा गट सशक्त केला जात असल्याने ‘चहापेक्षा किटली गरम’ अशी अवस्था झाली आहे.
नगरपालिका निविदा प्रक्रियेतील टक्केवारीचे वाटेकरी, कंत्राटदारीतून मुजोर झालेली काही नेतेमंडळी, पुरवठा यंत्रणेचे लाभार्थी, अवैध व्यवसायातील सहभागासह अन्य न्यायप्रविष्ट प्रकरणे उकरून काढल्याने अनेकांची निष्ठा बदलली. त्यामुळे दोन्ही प्रमुख पॅनेलमध्ये आयाराम- गयाराम यांना स्थान मिळाले आहे.
मागील वेळेचे पक्षीय बलाबल (एकूण - २४)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शिवसेना युती- १४,
नागरिक हित संरक्षण मंडळ- १०
नगराध्यक्षा - शीतल कटारिया (नागरिक हित)
नगरसेवक संख्या आता- २६
नगराध्यक्ष आरक्षण - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
स्थानिक प्रमुख प्रश्न
सार्वजनिक अस्वच्छता,
कचरा डेपोचा अभाव
दिवसाआड एकवेळ होणारा पाणीपुरवठा
गोपाळवाडी रस्ता भागात स्मशानभूमी व भाजी मंडईचा अभाव
प्रचारातील प्रमुख मुद्दे
सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग केलेल्या कामांचा दर्जा मागणी नसताना उभारलेला कत्तलखाना
अपूर्ण क्रीडा संकुल उद्यान, बालोद्यान, सभागृह, नाट्यगृह, अभ्यासिका, मैदान नसलेले शहर
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.