पुणे

Maharashtra Government : थर्टी फर्स्ट, न्यू इयर अन् रात्रभर दारू… शिंदेंना ठाकरेंच्या सैनिकांचे सवालच-सवाल

Sudesh Mitkar

Pune News : तळीरामांच्या थर्टी फर्स्ट उत्साहावर विरजण पडू नये म्हणून राज्य सरकारने 31 डिसेंबरला पहाटे 1 वाजेपर्यंत मद्य विक्री करण्यास परवानगी दिली आहे, तर महानगरांमध्ये पहाटे 5 वाजेपर्यंत ही परवानगी असणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात 31 डिसेंबर रोजी पहाटे 1 वाजेपर्यंत देशी, विदेशी मद्य विक्री व बिअर विक्री सुरू राहणार आहे. सरकारच्या या निर्णयांवर पुण्यातील ठाकरेंच्या सैनिकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवारांना सवाल केले आहेत.

शिवसेना ( ठाकरे गटाचे) मुंढवा शाखा प्रमुख यश गायकवाड यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमत्र्यांना पत्र पाठवून काही सवाल केले आहेत. राज्य सरकारने 31 डिसेंबरलाची रात्र आणि 1 जानेवारी 2024 रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत तळीरामांसाठी सकारात्मक विचार करून सेवा करायची म्हणून बार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील तळीराम खूप आनंदात असून यामुळे सरकारच्या तिजोरीला आर्थिक हातभार लागेल परंतु, दारू पिऊन कायम नशेत असलेले संसारिक पुरुष, तसेच कसाबसा संसार सांभाळून जगत असलेल्या माऊलींचा आणि त्या परिवाराचा सरकार विचार करणार का? असा सवाल या पत्रातून सरकारला विचारण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

31 डिसेंबरच्या रात्री दारू पिऊन धिंगाणा घालण्याचे प्रकार घडत आहेत. दारू पिऊन गाडी चालवल्याने गंभीर अपघात होतात. पुण्यातील उच्चभ्रू मुली नशेत असताना त्यांच्यावर अत्याचारासारखे गुन्हे घडतात. अशा परिस्थितीत तळीरामांसाठी आणखी वेळ वाढवून दिल्याने असे गुन्हे वाढतील तसेच अपघातांचे प्रमाण देखील वाढेल. याची जबाबदारी सरकार घेणार का, अशी विचारणा गायकवाड यांनी सरकारकडे केली आहे.

गैरप्रकार टाळण्यासाठी सरकारने 31 डिसेंबरला आणि 1 जानेवारीला प्रत्येक चौकात बंदोबस्त लावावा शिवाय 24 तास राज्यातील एसटी, बस तसेच मेट्रो व लोकल रेल्वे सेवा सुरू ठेवण्यात यावी. यामुळे गुन्हे व अपघात आटोक्यात येतील, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.

सध्या देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे गर्दी करू नका, असे आवाहन करण्याऐवजी सरकारच्या या निर्णयामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून या निर्णयाचा फेरविचार करावा नाही तर अनर्थ होईल.2020 सारखी परिस्थिती निर्माण झाल्यास याची जबाबदारी कोण घेईल, असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांना विचारण्यात आला आहे.

(Edited by Sudesh Mitkar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT