Pune News : महाराष्ट्रातील काही भागांमध्ये प्रचंड पाऊस पडत आहे. या पावसामुळे राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले असून शेती पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि त्या पद्धतीने शेतकऱ्यांची मदत करावी, अशी मागणी सातत्याने जोरदार आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पुण्यामध्ये याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळण्याचे पाहायला मिळाले. माध्यमांशी संवाद साधताना रवींद्र चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रातील सहा विविध जिल्ह्यांमध्ये पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसान ग्रस्त भागातील नागरिकांसाठी सरकारकडून जी मदत व्हायला हवी, ही मदत करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली आहे.
फडणवीस यांनी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देखील आपापल्या परीने मदत करण्याची विनंती केली होती. त्यानुसार गोळा करण्यात आलेली मदत सोलापूर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही मदत गरजूंपर्यंत पोहोचवण्यात येईल, असे चव्हाण म्हणाले.
पूरग्रस्त भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत होणं अत्यंत गरजेचे आहे. त्याच दृष्टिकोनातून सरकार हे मायबाप म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी देखील आपापल्या परीने त्या ठिकाणी मदत करत आहे. त्यामुळे सबंध महाराष्ट्र या पूरग्रस्तांच्या पाठिशी असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
पूरग्रस्तांसाठी केंद्र शासन देखील लवकरच मदत करेल. मात्र त्यापूर्वी राज्य शासनाची मदत त्यांच्यापर्यंत पोहोचलेली असेल, असं रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं. त्यानंतर रवींद्र चव्हाण यांना राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, असा प्रश्न पत्रकारांनी केला. त्यांनी तो प्रश्न ऐकून धन्यवाद म्हणत त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला. तरी देखील वारंवार पत्रकारांनी त्यांना याबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी या प्रश्नाला उत्तर देणे टाळल्याचे पाहायला मिळाले.
भाजपाकडून उद्धव ठाकरे यांना दसरा मेळावा रद्द करून तो निधी आपातग्रस्तंना द्यावा असा सल्ला देण्यात येत आहे. त्याबाबत बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, कुणी काय करावं हा स्वाभाविकपणे त्यांचा प्रश्न आहे. प्रत्येकाने आपल्या पध्दतीने तो निर्णय घेणे आवश्यक आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सूचना करून मदत करण्यास सांगितला आहे. उद्धव ठाकरेंनी काय करायचं, हा पूर्णपणे त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचं रवींद्र चव्हाण म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.