Mahesh Landge on Pawna Jalwahini:  Sarkarnama
पुणे

Mahesh Landge on Pawna Jalwahini: भाजपचा विरोध असलेल्या पवना बंद जलवाहिनीसाठी महेश लांडगे सरसावले

उत्तम कुटे: सरकारनामा

Mahesh Landge PCMC Politics : भोसरीचे भाजपचे पैलवान आमदार महेश लांडगे यांची आमदारकीची दुसरी टर्म असल्याने त्यांची प्रत्येक विधीमंडळ अधिवेशनात दमदार कामगिरी होत आहेत. नागपूर येथील हिवाळी, तर मुंबईतील अर्थसंकल्पी या गत दोन अधिवेशनातही त्यांनी ठसा उमटवला होता.त्यातून पिंपरी-चिंचवडचा गेल्या १५ वर्षाचा शास्तीकराचा प्रश्न सुटला.तर,साडेबारा टक्के जमीन परताव्याचाही मार्गी लागला.सोमवारपासून (ता.१७) सुरु होत असलेल्या पावसाळी अधिवेशनातही तीन लक्षवेधी दिल्या आहेत.

पिंपरी-चिंचवडच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा पवना बंद जलवाहिनी योजनेवर आ.लांडगेंची एक लक्षवेधी आहे. पिंपरी महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असेपर्यंत (२०१७) शहराला दररोज पाणीपुरवठा होत होता. मार्च २०१७ ला भाजप सत्तेत आली. त्यानंतर दीड वर्षातच २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणी शहरात सुरु झाले.

गेल्या साडेतीन वर्षापासून ते सुरुच आहे. ४२ किलोमीटर दूरवरील मावळ तालुक्यातील पवना धरणातून उद्योगनगरीसाठी पाणी आणले जाते. धरणातील पाणी पवना नदीत सोडले जाऊन ते शहरात बंधाऱ्यावर अडवून उचलले जाते. दरम्यान, ते इतपर्यंत येईपर्यंत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होतो. त्यामुळे अजित पवार उपमुख्यमंत्री असताना पवना धरणातून थेट बंद जलवाहिनीतून शहरापर्यंत पाणी आणण्याची योजना मंजूर करण्यात आली.तिचे काम सुरु झाले. मात्र, तिला मावळातील शेतकऱ्यांनी विरोध केला.

मावळ भाजप आणि तत्कालीन आमदार भाजपचे बाळा भेगडेंनीही विरोध केला. म्हणून भाजप ही स्थानिकांच्या बंद जलवाहिनीच्या विरोधातील ९ ऑगस्ट २०११ च्या आंदोलनात सामील झाली. त्यांनी पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे रोखून धऱला.त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा बळी गेला, तर काही जखमी झाले. या घटनेमुळे नंतर हा प्रकल्प बंद करण्यात आला. त्यामुळे तोपर्यंत त्याच्यावर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेला.आता तोच प्रकल्प पुन्हा सुरु करण्यासाठी आ. लांडगे यांनी लक्षवेधी दिली आहे. तो सुरु झाला,तर २०३१ सालापर्यंत शहराचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. असे ते म्हणाले.

उद्योगनगरीतील उद्योगांना सांडपाणी प्रक्रियायुक्त पाणी दिले,तर पिण्यासाठी आणखी पाणी उपलब्ध होणार असल्याने तशी कार्यवाहीही करण्याची मागणी त्यांनी या लक्षवेधीव्दारे केली आहे. नमूद करण्याजोगी बाब पवना बंद जलवाहिनी योजनेला हिरवा कंदिल देणारी राष्ट्रवादी तथा अजित पवार आणि त्याला त्यावेळी विरोध करणारी भाजप आणि शिवसेना असे तिघेही आता एकत्रितपणे राज्य़ातील सत्तेत आहेत.या योजनेची मुहूर्तमेढ रोवणारे अजित पवार हे आताही सरकारात त्याच पदावर (उपमुख्यमंत्री) आहेत.

पिंपरी-चिंचवडकरांवरील १५ वर्षाचा शास्तीकर नुकताच हटला.पण, समायोजन हा दुसरा नवा कर शहरवासियावर लादला आहे.कचरा विघटन व हाताळणीसाठी घरटी वार्षिक ७२० रुपये या आर्थिक वर्षापासून आकारण्यास पिंपरी महापालिकेने सुरवात केली आहे.त्याला सर्वच स्तरातून मोठा विरोध आहे. तसेच तो पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्यात आल्य़ाने आ. लांडगेंनी त्याला कडाडून विरोध केला. मात्र,प्रशासनाने तो जुमानला नाही. त्यामुळे थेट अधिवेशनातच त्यावर आ.लांडगेंनी आता लक्षवेधी देऊन तो रद्दच करण्याची मागणी केली आहे.

तसेच आतापर्यंत वसूल करण्यात आलेले हे शुल्क मिळकतधारकांना परत देण्यास वा त्याचे समायोजन त्यांच्या मिळकतकरात करण्यास त्यांनी सांगितले आहे.त्यांच्या मतदारसंघात नुकताच मोठा वीजबिघाड होऊन ४८ तास लोकांना अंधारात रहावे लागले होते. तसेच अद्यापही भोसरीच्या ग्रामीण भागात ओव्हरहेड वीजेच्या तारा आहेत.त्या भुमिगत करण्याची तसेच वाढत्या लोकसंख्य़ेनुसार महावितरणचीही यंत्रणा सक्षम करावी अशी तिसरी लक्षवेधी त्यांनी दिली आहे. त्या लागल्या,तर शहराचे हे मुलभूत प्रश्न मार्गी लागण्यात मदत होणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT