Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Manoj Jarange Patil : फडणवीसांनी डाव टाकण्यापूर्वीच जरांगे-पाटलांनी घेतला सावध पवित्रा; कशी आखणार रणनीती?

Sudesh Mitkar

Pune News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील हे मतदारसंघ निहाय आढावा बैठका घेताना दिसत आहेत. सध्या ते पुण्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी जिल्ह्यातील 21 मतदारसंघाचा आढावा त्यांनी घेतला. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आत्ताच उघड करणार नाही. निवडणुका जाहीर झाल्यानंतर याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे, असं जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) म्हणाले, "पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांबाबत चर्चा झाली. पण, निर्णय कोणताही झाला नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची एक मोठी बैठक घेण्यात येणार आहे. त्या बैठकीमध्ये निवडणूक लढवायची की फक्त पाडायचं? याचा निर्णय घेण्यात येईल. हा निर्णय घेण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं होतं. मात्र, निवडणूक जाहीर न झाल्यानं ती बैठक पुढे ढकलण्यात आली आहे."

"निवडणूक जाहीर झाल्यानंतर बैठक घेऊन आम्ही रणनीती उघड करणार आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी आम्ही आमची रणनीती जाहीर केल्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) डाव टाकतील आणि त्यांची वेगळी रणनीती तयार करतील," असा सावध पवित्रा जरांगे-पाटलांनी घेतला आहे.

"सरकारमधील आणि विरोधातील नेते आंतरवलीत येऊन फुकट चहा पिऊन जातात. पण, मी त्यांना नाही म्हणू शकत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे देखील काही लोक मला गुपचूप घेऊन भेटतात आणि त्यांच्याविरोधात तक्रारी करतात. अशा मोठ्या प्रमाणात तक्रारी माझ्याकडे आहेत. जर निवडणूक लढण्याचं निश्चित झालं, तर त्यावेळेस मी या सगळ्यांचा गोष्टी मी उघड करेल," असा इशारा जरांगे-पाटलांनी दिला आहे.

"देवेंद्र फडणवीस खुनशी आहेत. दहशतीने निवडणूक जिंकता येत नाही, तर मायेनं जिंकता येणार. मराठवाड्यात पावसामुळे मोठं नुकसान झालंय. पण, मदत मिळत नाही. देवेंद्र फडणवीसांशिवाय सरकारचं पानही हलत नाही.‌ मुख्यमंत्री कोणीही असो निर्णय फडणवीसच घेतायत. देवेंद्र फडणवीस मराठाद्वेषी. त्यामुळे सगे सोयरेचा निर्णय होत नाही. देवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाहीत, मात्र मराठाद्वेषी आणि वागण्याची पद्धत विचित्र आहे," अशी टीका जरांगे-पाटलांनी केली आहे.

"भाजपचे आठ-दहा आमदार माझ्याकडे आले होते. त्यांना म्हटलं देवेंद्र फडणवीसांना जाऊन आरक्षण द्यायला सांगा. ते गेले सागर बंगल्यावर आणि परतच आलेच नाहीत. देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावर जादू करतात. माझ्यावर खोटा खटला दाखल केला," असा आरोप जरांगे-पाटलांनी केला आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT