Shrirang Barane, Bala Bhegade Sarkarnama
पुणे

Shrirang Barane Vs Bala Bhegde : श्रीरंग बारणे-बाळा भेगडे यांच्यात वादाची ठिणगी? मावळातील रेल्वे स्टेशनवरून रंगला कलगीतुरा

उत्तम कुटे

Pune News : रेल्वे मंत्रालयाच्या अमृत भारत स्टेशन योजनेत देशातील अनेक रेल्वे स्थानकांच्या विकासाचे सामूहिक भूमिपूजन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन करणार आहेत. यात पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी आणि मावळातील तळेगाव रेल्वे स्टेशनचाही समावेश आहे. या स्थानकांच्या विकासासाठी आपणच प्रयत्न केल्याचा दावा शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी केला आहे. परिणामी विकासकामांच्या श्रेयवादातून मावळात महायुतीतील भाजप-शिंदे गट आमने-सामने ठाकल्याचे दिसून येत आहे. (Latest Political News)

रेल्वेच्या देशातील साडेसात हजारापैकी महत्वाच्या मोठ्या बाराशे स्टेशनचा विकास, आधुनिकीकरण आणि नुतनीकरणाचा महत्वाकांक्षी प्रकल्प रेल्वे खात्याने हाती घेतला आहे. त्यावर २५ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यात महाराष्ट्रातील ४४ स्टेशन असून त्यातील काहींच्या कामाला रविवारी सुरवात केली जाणार आहे.

या योजनेत मध्य रेल्वेवरील तळेगाव आण आकुर्डी स्टेशनचे हे काम ७३ कोटी रुपये खर्चून केले जाणार आहे. या दोन्ही स्टेशनसह देहूरोड आणि चिंचवड अशा चारही स्थानकांचा समावेश आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे या योजनेत झाल्याचा दावा मावळचे शिवसेना (शिंदे) खासदार श्रीरंग बारणे यांनी केला.

हा दावा मावळचे भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी लगेच दुसऱ्या दिवशी खोडला. यावेळी भेगडेंनी आपल्या प्रयत्नांमुळेच तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनचा समावेश अमृत योजनेत झाल्याचा करून त्यांनी बारणेंना 'खो' दिला.

दरम्यान, मावळातील तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनच्या विकासाच्या श्रेयबाजीवरून भाजप, शिवसेनेत सुरु झालेल्या श्रेयाच्या लढाईचे लोण आज पिंपरी-चिंचवडला आले. ३३ कोटी ८० लाख रुपये खर्चाच्या आकुर्डी रेल्वे स्थानकाच्या नुतनीकरणाचेही काम रविवारीच सुरु होणार आहे. आझादी का अमृतमहोत्सव अभियान समारोपाच्या माहिती देण्यासाठी पिंपरी-चिंचवड भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शहर दौऱ्याच्या तोंडावर शनिवारी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी शिवसेना खासदार बारणे यांनी आपल्या प्रयत्नांतून या चार रेल्वे स्थानकांचा कायापालट होत असल्याच्या दाव्यावर आमदार उमा खापरेंनी केंद्र सरकार हे काम करीत असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे त्याचे श्रेय आपल्या भाजपकडेच घेतले. या कामाबद्दल त्यांनी तसेच भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आभारही मानले. यामुळे मावळचे खासदार बारणे आणि भाजपमध्ये रेल्वे स्टेशनच्या विकासकामांच्या श्रेयवादातून खडाजंगी होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT