Rohit Pawar
Rohit Pawar Sarkarnama
पुणे

मुंबई पालिकेनंतर राज्यात मध्यावधी निवडणुका : रोहित पवारांचे भाकित

रवींद्र पाटे

नारायणगाव (जि. पुणे) : मुंबई (Mumbai) महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता आहे, त्यामुळे राज्यात आपल्या विचाराचे सरकार आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले. (Mid-term elections in the state after Mumbai Municipality : Rohit Pawar)

जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त कांदळी औद्योगिक वसाहत येथे आयोजित कार्यक्रमात पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. आमदार पवार म्हणाले की, मागच्या पिढीने आम्हाला जमिनीवर व लोकांमध्ये राहून काम करण्याची शिकवण दिली आहे. आमदार अतुल बेनके हे सदैव युवा पिढी, महिला, ज्येष्ठांच्या उन्नतीचा विचार करतात. पाच कोटी रुपये खर्चून ते जुन्नर तालुक्यातील युवकांसाठी अद्यावत क्रीडा संकुल उभारणार आहेत.

राजकारणात २०२४ नंतरचा काळ हा युवकांचा असणार आहे. युवकांचे दिवस आले की, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णयसुद्धा युवकच घेणार आहोत. राजकारणात येताना मी खूप पुढचा विचार करुन आलोय. पदासाठी नाही, मात्र महाराष्ट्रासाठी काम करायचं आहे. राजकारण करत असताना सहकारी मित्र आमदार बेनके यांना कधीच विसरणार नाही. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज ५ हजार ५५५ वृक्षारोपण करण्यात आले. आगामी निवडणुकीत त्यांना ५५ हजारांच्या मताधिक्याने विजयी करा. यासाठी विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर व माजी सभापती संजय काळे यांची त्यांना साथ राहील, असेही आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

आमदार बेनके म्हणाले की, माजी आमदार वल्लभ बेनके यांनी विकासाचा पाया रचला आहे. शरद पवार यांचा विचार घेऊन आम्ही विकासाचे काम करत आहोत. सध्या राजकीय परिस्थिती बिघडली आहे. कितीही प्रलीभने आली तरी मी नीतिमत्ता, पक्षनिष्ठा ढासळून देणार नाही. जनेतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. सर्वसामान्य जनतेला माझ्या हृदयात स्थान असून त्यांच्या सेवेसाठीच अखेरपर्यंत काम करत राहणार आहे.

विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर म्हणाले की, ‘याची आडवा याची जिरवा’ या पद्धतीने राजकारण सुरू राहिल्यास कार्यकर्त्यांनी काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची विचारधारा एकच आहे. आमचे तात्विक मतभेद असले तरी आमदार अतुल बेनके यांना आमची सहकार्य करण्याची भूमिका राहिली आहे.

सभापती काळे यांनी आमदार अतुल बेनके हे विकासाचे व सर्वसामान्यांच्या हिताचे राजकारण करत आहे. सन २०२४ नंतर राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार असून अतुल बेनके हे पुन्हा आमदार होतील, असा विश्वास व्यक्त केला.

या वेळी ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर गणपतराव फुलावडे,उद्योजक किशोर दांगट, विनायक तांबे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार , शरद लेंडे, विवेक वळसे पाटील, देवराम लांडे, अंकुश आमले, मोहित ढमाले, विकास दरेकर आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT