Dattatraya Bharane
Dattatraya Bharane sarkarnama
पुणे

कॅबिनेट मंत्री म्हणून 19 वर्ष रुबाब केला; पण खुर्चीची जाणीव ठेवली नाही!

डॉ. संदेश शहा,

इंदापूर : राज्य मंत्रिमंडळात १९ वर्ष कॅबिनेट मंत्री म्हणून काम करताना रुबाब केला. खुर्चीची जाणीव ठेवली नाही, जनतेची दिशाभूल केली. त्यामुळे जनतेने तुम्हाला घरी बसवले. पहिल्या पराभवाच्या वेळी तुम्ही अपघात म्हणाला तर दुसरा पराभव तुम्ही काठावर का होईना मान्य केला. मात्र, मंत्रीपदावर असताना स्वतःची पोळी भाजून घेण्याचे काम केल्याने जनतेने तुम्हास घरी बसविले. त्यामुळे तुम्ही शांत घरी बसा अशी टीका सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharane) यांनी भाजप (BJP) नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्यावर करून आगामी निवडणुकांसाठी रणसिंग फुंकले.

सध्या सुरू असलेल्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात इंदापूर (Indapur) तालुक्यास भरपूर निधी मिळाला आहे. मात्र, अधिवेशन झाल्यावर आम्ही पेपर फोडू असे सूतोवाच भरणे यांनी केले. गोखळी व तरंगवाडी ( ता. इंदापूर ) येथे ७ कोटी ७५ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारतीचे उदघाटन भरणे यांच्या हस्ते झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.

या वेळी भरणे म्हणाले, तालुक्यातील विरोधकांना काम राहिले नसल्याने ते शेती, वीज आणि पाण्याचे राजकारण करत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील लोकांना रसद पुरवतात. आम्हाला निष्क्रिय मंत्री म्हणून हिनवत असतात. मात्र, आम्ही तोंड उघडले तर तुमची वाचा बंद होईल. आम्ही कोरोना महामारी मधे घरोघरी फिरलो, जनतेस जीवनावश्यक किट वाटले. मात्र, तुम्ही जनतेला काही मदत केली नाही. तुमचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे आहेत. हे जनतेने ओळखले आहे. निवडणूक आली की नारळ फोडायचे, खोटी आश्वासने द्यायचे आता बंद करा, असेही भरणे म्हणाले.

मी सुध्दा हाडाचा शेतकरी असून शेतकऱ्यांच्या वीज, पाण्याची अडचण कायमस्वरूपी सोडविण्यासठी प्रयत्न करत आहे. विकास हा माझ्या रक्तात आहे हे विरोधकांनी लक्षात घ्यावे, असा सल्ला त्यांनी दिला. तरंगवाडी तलावाची उंची व खोली वाढविण्यासंदर्भात प्रदीप गारटकर यांच्या सूचनेनुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या वेळी प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती तसेच विद्यमान सदस्य प्रवीण माने, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले. डॉ. शशिकांत तरंगे आदींची भाषणे झाली. ग्रामस्थांच्या वतीने बाळासाहेब महानवर यांनी काही मागण्या केल्या. स्वागत सरपंच अलका पोळ व ग्रामपंचायत सदस्य बापू पोळ, ग्रामसेविका अस्मिता गायकवाड यांनी केले. प्रास्ताविक गोखळीचे उपसरपंच सचिन तरंगे तर सूत्रसंचलन बाळासाहेब हरणावळ यांनी केले. या वेळी प्रताप पाटील, सचिन सपकळ, युवराज पोळ, दत्ता घोगरे, शुभम निंबाळकर, नवनाथ रुपनवर, विशाल मारकड, हामा पाटील, राघू पारेकर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT